दूध संकलनापासून लोखंडाच्या विक्रीपर्यंत वजनकाट्यांचा मोठा 'झोल'! बारामतीत वजन काट्यांच्या तातडीने तपासणीची तीव्र मागणी

बारामती तालुक्यातील विविध भागांत वजन-मापात तफावत करून ग्राहक आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांमध्ये फेरफार किंवा छेडछाड करून वजनात तफावत केली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. या सर्व प्रकाराची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

बारामतीसह ग्रामीण भागात बांधकामासाठी लागणारे लोखंड, पोलाद तसेच इतर साहित्य खरेदी करताना वजनानुसारच बिल आकारले जाते. मात्र, काही ठिकाणी या वजनकाट्यांमध्ये संगनमताने किंवा बेकायदेशीरपणे छेडछाड करून प्रत्यक्षात खरेदीदारांना कमी माल दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दुसरीकडे, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध संकलन करताना आधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांचा वापर केला जातो. काही विशिष्ट संकलन केंद्रांवरील काट्यांमध्ये छेडछाड करून वजनात फेरफार केला जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी थेटपणे केल्या आहेत. दूध हा रोजचा व्यवसाय असल्याने आणि दररोज मोठ्या प्रमाणात दूध संकलित होत असल्याने वजनातील अगदी किरकोळ तफावत सुद्धा शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पणावर मोठा परिणाम करणारी ठरू शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना दरमहा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

वजन आणि मापातील या संभाव्य फसवणुकीला आळा घालण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे बनले आहे. बाजार समित्या, लोखंड व बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने, तसेच दूध संकलन केंद्रांवर अचानक भेटी देऊन इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांची कसून तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या काट्यांचे अधिकृत सील, पडताळणी प्रमाणपत्र, त्याची वैधता आणि प्रत्यक्ष वजनातील अचूकता यांची कसून तपासणी करून जे व्यावसायिक किंवा केंद्रचालक दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, असे नागरिक व शेतकरी वर्गाचे ठाम म्हणणे आहे.

तक्रार व कारवाईसाठी प्रभावी यंत्रणेची गरज वजन आणि मापातील तफावतीमुळे ग्राहक किंवा शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी त्यांना कोणतीही अडचण न येता तक्रार करण्यासाठी एक स्पष्ट व सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे. संबंधित शासकीय विभागाने विशेष मोहीम राबवून बारामती तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या वजनकाट्यांची खात्रीशीर तपासणी करावी. तसेच दोषी आढळलेल्या व्यावसायिकांची नावे व कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, जेणेकरून इतरांवर वचक बसेल. यासंदर्भात वजन-मापातील फसवणुकीच्या सर्व अधिकृत तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी होऊन लवकरात लवकर वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

"फसवणूक झाल्याचा मला स्वतःला वैयक्तिक अनुभव आहे. बारामती तालुक्यातील अनेक दूध संस्थांच्या वजन-मापात मोठी तफावत आढळते. शेतकरी व ग्राहकांनी याबाबत स्वतः जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. वजनात तफावत निदर्शनास आल्यास त्याला कडाडून विरोध केला पाहिजे आणि तातडीने कारवाईची मागणी केली पाहिजे." — धीरज गायकवाड, दूध उत्पादक शेतकरी.

"हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. याविषयी प्राप्त माहितीची शहानिशा करून आम्ही तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करू. वजन-मापातील फसवणुकीसंदर्भात थेट मुख्य कार्यालयाला ई-मेलद्वारे किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येते. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. ग्राहकांनी व शेतकऱ्यांनी पूर्ण जागरूकपणे पुढे ये येऊन अशा बाबींची तक्रार करावी." — राजेंद्र टाळकुटे, वैधमापनशास्त्र निरीक्षक, बारामती.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *