सातारा: फलटण येथील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबासाठी साहित्यिकांचा मोठा पुढाकार; शिक्षणासाठी काढलेले वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडले

सातारा: साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचे समाजाप्रती काहीतरी उत्तरदायित्व असते, या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत 'पानिपत'कार आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, साहित्यिक राजीव श्रीखंडे आणि त्यांच्या काही साहित्यिक मित्रांनी एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श असा उपक्रम हाती घेतला आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना संशयास्पद मृत्यू झालेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या दुःखी कुटुंबाला या साहित्यिकांनी मदतीचा मोठा हातभार लावला आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी त्यांच्या उच्च शिक्षणासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम या साहित्यिकांनी एकत्र येऊन भरली आहे, ज्यामुळे वृद्ध वडिलांच्या डोक्यावरील मोठा आर्थिक ताण दूर झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आणि मोठी चर्चा रंगली. मूळच्या बीड जिल्ह्यातील असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी अत्यंत हलाकीच्या आणि कष्टमय परिस्थितीमध्ये आपल्या मुलीला वैद्यकीय शिक्षण दिले होते. यासाठी त्यांनी एका बँकेतून मोठे शैक्षणिक कर्ज काढले होते. मात्र, अचानक ओढवलेल्या या आघातामुळे आणि तरुण मुलगी गमावल्यामुळे दुःखात असलेल्या तिच्या वडिलांसमोर हे मोठे बँक कर्ज कसे फेडायचे, असा अत्यंत गंभीर व पेसाचा प्रश्न उभा ठाकला होता.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील हे एका व्याख्यानाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात गेले होते. त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी मृत डॉ. संपदा मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. या भेटीत त्यांनी कुटुंबाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली, तेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी वडिलांनी काढलेले कर्ज तसेच असल्याचे आणि ते फेडण्यासाठी त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लेखक विश्वास पाटील यांनी साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्यासह इतर काही सुहृद साहित्यिक मित्रांशी सविस्तर चर्चा केली. या सर्व सहकाऱ्यांनी मिळून स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करण्याचे ठरवले आणि इतर मित्र-परिवारालाही मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सर्वच स्तरातून आणि साहित्यिकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सर्व १० ते १२ साहित्यिकांनी मिळून केलेल्या सामूहिक आर्थिक सहकार्यातून १७ ऑगस्ट रोजी बँकेच्या संबंधित शाखेत जाऊन कर्जाच्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यात आला व ते कर्ज पूर्णपणे फेडण्यात आले. विशेष म्हणजे, ही मदत केल्यानंतर कोणतीही प्रसिद्धी न घेता अत्यंत निस्वार्थ भावनेने हा सामाजिक ओलावा जपण्यात आला आहे, ज्यामुळे साहित्य वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये या निर्णयाचे अत्यंत कौतुक होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *