शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! आयआयटीएमच्या अहवालानुसार 'हीट एक्स्पोजर'मध्ये तब्बल १५७ टक्क्यांची वाढ; लोकसंख्या आणि तापमानवाढीचा संयुक्त परिणाम

पुणे : हवामान बदलामुळे गेल्या काही दशकांमध्ये उष्णतेच्या लाटा (Heat Wave) ही देशातील सर्वात जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक बनली आहे. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) एका नव्या आणि महत्त्वाच्या अभ्यासानुसार, भारतातील शहरी भागांमध्ये उष्णतेचा सामना करण्याच्या प्रमाणात म्हणजेच 'अर्बन हीट एक्स्पोजर'मध्ये तब्बल १५७ टक्क्यांची धक्कादायक वाढ झाली आहे. या वाढीमुळे देशातील शहरी नागरिकांच्या आरोग्यासमोर आणि पर्यावरणासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

आयआयटीएमच्या या वैज्ञानिक अभ्यासानुसार, गेल्या ३४ वर्षांच्या कालावधीत भारतातील शहरांमध्ये धोकादायक उष्णतेच्या दिवसांमध्ये जवळपास एका महिन्याची भर पडली आहे. विशेष म्हणजे, या तीव्र वाढीमध्ये दोन मुख्य कारणे प्रामुख्याने समोर आली आहेत. यातील सुमारे ६४ टक्के वाढ ही तीव्र लोकसंख्या वाढीमुळे (Population Growth) झाली असून, लोकांचे शहरांमधील स्थलांतर आणि वाढलेली गर्दी याला कारणीभूत आहे. तर उर्वरित ३६ टक्के वाढ ही थेट शहरी भागातील तापमानवाढ (Urban Warming) आणि हवामानातील बदलांमुळे झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी सिमेंटची जंगले, हरित क्षेत्राचे (Green Cover) घटते प्रमाण, वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि मानवनिर्मित उष्णता यामुळे शहरांची उष्णता शोषून घेण्याची क्षमता वाढली आहे. परिणामी, वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेच्या लाटांचा आणि असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने आणि पर्यावरण तज्ज्ञांनी या अहवालाची गंभीर दखल घेऊन शहरांचे नियोजन करताना पर्यावरणीय संतुलन राखणे आणि वृक्षारोपणासारख्या उपाययोजना वेगाने राबवणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *