पुणे: सुषमा अंधारे पक्ष सोडणार नाहीत, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना योग्य न्याय द्यावा: सचिन अहिर यांचे स्पष्ट मत

पुणे: मित्रपक्षाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने पुण्यात शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही,अशी खंत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पुण्यात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी मी अधिक वेळ देणार असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात संधी दिली जाईल. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढलेली दिसेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिर सोमवारी प्रथमच पुण्यात आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रसंगी शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, अजय भोसले, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना ते म्हणाले की, 'विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची मोठी जबाबदारी असली, तरी मी राजकीय मर्यादांचे पालन करून पक्षसंघटनेसाठी सतत कार्यरत राहीन. विविध समाजघटकांतील आणि विशेषतः वंचित घटकांतील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न राहतील.'

 

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी देखील महत्त्वाची विधाने केली. ते म्हणाले की, 'सुषमा अंधारे यांच्याबाबतची माझी भूमिका ही वैयक्तिक आहे. त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या खऱ्या अर्थाने चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्त्या असल्याने कधीही पक्ष सोडणार नाहीत, असा मला पूर्ण विश्वास आहे. मात्र, पक्षाने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.'

दरम्यान, स्वतः सचिन अहिर यांनी काही काळापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला रामराम ठोकून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर ते विधान परिषदेचे उपसभापती झाले आहेत. असे असले तरी, जुन्या सहकाऱ्यांविषयी आणि सुषमा अंधारे यांच्या भूमिकेविषयी त्यांनी मांडलेले हे विचार राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांचा विषय ठरत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *