५४ किलोमीटरच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर पडले खड्डे; अपघातांच्या धोक्यासह वाहतूक कोंडीत मोठी वाढ

पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक व अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ५४ किलोमीटर लांबीच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे आणि धोकादायक खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असून, यामुळे अपघातांच्या धोक्यात कमालीची वाढ झाली आहे. याशिवाय, सततच्या वाहतूक कोंडीमुळे चाकरमानी, कामगार, विद्यार्थी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर हा पट्टा राज्याच्या औद्योगिक नकाशावर अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने, अवजड ट्रक, कंपनीचे कंटेनर, स्कूल बसेस आणि दुचाकींची मोठी ये-जा असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो. परिणामी, चाकण आणि परिसरातील मुख्य चौकांमध्ये तासन्तास ट्रॅफिक जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून गंभीर जखमी होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

स्थानिक नागरिक, कामगार आणि वाहनचालकांनी अनेकदा प्रशासनाकडे या रस्त्याच्या दुरस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाने तात्पुरत्या मलमपट्टीचे उपाय न करता या ५४ किमीच्या संपूर्ण महामार्गाचे काँक्रीकिरीकरण आणि दर्जेदार रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरून होणाऱ्या अपघातांना आळा बसेल आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येणार नाही, अशी आक्रमक मागणी आता जोर धरत आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *