मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा व कलाकारांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याचं तोंडभरुन कौतुक केलं, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांकडून प्रसाद ओकचे मोठे कौतुक: ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेता प्रसाद ओकला 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारा'नं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओक याने 'धर्मवीर' चित्रपटात साकारलेल्या आनंद दिघे यांच्या ऐतिहासिक भूमिकेबाबत भरभरून भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, "विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम... निळू फुले म्हणजे अत्यंत इरसाल असा राजकारणी... तसंच आता, प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे..." मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे शब्द उच्चारताच सभागृहात एकच दाद मिळाली आणि अभिनेता प्रसाद ओक स्वतः जागेवरून उठून उभा राहिला व मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून नतमस्तक झाला.

प्रसाद ओक यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद ओक, जे एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि सुंदर कलावंत आहेत... मला असं वाटतं की, कलेच्या क्षेत्रात एक प्रकारे '३६० डिग्री मॅन' म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून जे काम करतात, ते खरोखरच विलक्षण आहे. ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंना प्रत्यक्ष पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी आयुष्यभर प्रसाद ओक यांनी साकारलेली ती प्रतिमा इतकी सुंदर आणि हुबेहूब आहे की, त्यांच्याकरता आता तेच खरे धर्मवीर आनंद दिघे ठरले आहेत. इतकं सुंदर आणि सजीव काम त्यांनी या भूमिकेत केले आहे."

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्कीलपणे असेही म्हटले की, "आत्ताच त्यांनी सांगितलं की त्यांनी १२५ सिनेमे केले आहेत... पण प्रसाद ओक, तुम्ही काळजी करू नका, एवढ्या लवकर तुम्हाला जीवनगौरव दिला जाणार नाही, कारण अजून खूप मोठे पुरस्कार तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यामुळे ही सेवा तुम्ही सातत्यानं सिनेसृष्टीसाठी अविरतपणे सुरू ठेवली पाहिजे."

इतर दिग्गजांचाही सन्मान व शासनाचे धोरण: या पुरस्कार सोहळ्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला 'राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' आणि दिग्गज सलीम खान यांना 'राज कपूर जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला होता (प्रकृती अस्वस्थतेमुळे सलीम खान यांच्या वतीने त्यांची पत्नी अभिनेत्री हेलन यांनी हा पुरस्कार स्वीकारला).

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटसृष्टीसाठी शासनाच्या आगामी योजनांची माहिती दिली. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशी 'चित्रनगरी' विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, विविध प्रकारच्या सेट्सची उपलब्धता एकाच ठिकाणी करून दिली जाईल. तसेच, मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे (Theaters) उपलब्ध करून देण्याचा एक सर्वसमावेशक आराखडा लवकरच जाहीर केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मराठी चित्रपटांचे आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही त्यांची खरी वैशिष्ट्ये असून मराठी रसिक आणि कलाकारांनी ही परंपरा उच्च स्तरावर नेऊन ठेवली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *