एन. रघुरामन यांचा कॉलम:पाळीव प्राण्यांमध्ये असते ‘उपचारशक्ती’

ती तलावाच्या काठावर बसून विचारांत हरवली होती. अचानक पाण्यात तिला चार घोडेस्वारांच्या सावल्या दिसतात. ती क्षणार्धात वळते आणि ओरडते, “चल धन्नो!” घोडीही तत्काळ तिच्याकडे पाहते. जणू आपल्या मालकिणीवर आलेले संकट तिला समजले होते. बसंती टांग्यावर चढण्याआधीच धन्नो वेगाने धावू लागते. टांग्यावर बसताच बसंती म्हणते, “पळ धन्नो, आज तुझ्या बसंतीच्या अब्रूचा प्रश्न आहे...” 51 वर्षांपूर्वीच्या ‘शोले’ चित्रपटातील हा प्रसंग अनेकांना आठवत असेल. काहींना प्रश्नही पडला असेल की एखादी घोडी धोका कसा ओळखू शकते? मात्र मला या प्रसंगाबद्दल कधीच शंका वाटली नाही. कारण माणसांसोबत राहणारे प्राणी आपल्या भावना समजून घेतात. आपला ताण कमी करतात. चिंता शांत करतात. काही रुग्णांत जगण्याची इच्छाही निर्माण करतात. अशा अनेक कथा मी वाचल्या होत्या. वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या होत्या. पण हे प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ आली ती माझ्या आईची ‘सीसू’शी झालेली मैत्री पाहिल्यावर. तो पाळीव कुत्रा होता. त्याला आमच्या घरात येण्याची परवानगी होती. सीसूची ओळख करून देण्यापूर्वी एक गोष्ट मान्य करावी लागेल. माझ्या लग्नात मलाही ‘हुंडा’ मिळाला होता. होय, सीसू. हा आमच्या घरी आलेला पाळीव कुत्रा माझ्या पत्नीसोबतच आला होता. लग्नाच्या वेळी तो आठ वर्षांचा होता. विशेष म्हणजे, नववधू-वरांपेक्षा आधी तोच गाडीच्या पुढच्या आसनावर बसला होता. सासरी पोहोचल्यावर नवदाम्पत्याचे औक्षण होण्यापूर्वीच तो घरात शिरला. प्रत्येक खोलीत जाऊन त्याने वास घेतला. सर्वकाही पाहिले आणि मग बाहेर येऊन औक्षणासाठी सर्वात पुढे बसला. प्रथम त्याच्या कपाळावर टिळा लावण्यात आला आणि त्यानंतर नवदाम्पत्याला. हे दृश्य पाहून उपस्थित सगळ्यांची हसून पुरेवाट झाली. जणू घराची पाहणी करून त्याने मंजुरी दिली होती. माझ्या पत्नीला हे घर सुरक्षित असल्याचा संदेश दिला होता. हळूहळू आमच्या स्वयंपाकघरातील चर्चाही सीसूच्या आवडी-निवडीभोवती फिरू लागल्या. एकदा माझ्या आईने सांगितले की, ‘सीसूला तुपाचा डोसा आवडतो.’ हा सन्मान आम्हाला सहसा हॉटेलमध्येच मिळत असे. मला स्वतःचा वाढदिवसही अनेकदा लक्षात राहत नसे. पण एकदा आईने सीसूच्या वाढदिवसासाठी ३०० रुपये खर्च केल्याचे सांगितले आणि मी थक्क झालो. त्यावर वाद घालण्याचा प्रयत्न केला. पण आईच्या प्रेमळ हट्टापुढे माझे काहीच चालले नाही. आई उपवास करत असे. तेव्हा सीसूही काही खात नसे. तो तिच्यासोबत जवळच्या मंदिरात जाई आणि पूजा पूर्ण होईपर्यंत शांतपणे वाट पाहत बसे. किमोथेरपीनंतर आई तीन-चार दिवस रुग्णालयात दाखल असली तरी तिची सर्वात मोठी चिंता सीसूच्या खाण्यापिण्याचीच असे. आम्ही तिला सांगायचो, ‘तो नीट खात नाही.’ तेव्हा ती म्हणायची, ‘सीसूच्या आधी माझा मृत्यू होऊ नये, एवढीच इच्छा आहे.’ कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातही तिच्या मनात जगण्याची उमेद शिल्लक होती. त्यामागे सीसूचे अस्तित्व मोठे कारण होते, असे आम्हाला अनेकदा वाटायचे. एकदा डॉक्टरांनीही सांगितले, ‘त्या औषधांना चांगला प्रतिसाद देत आहेत. कारण त्यांना घरी परतून सीसूला भेटायची ओढ आहे.’ आईची प्रकृती खालावत गेली तसतसा सीसू तिचा कायमचा सोबती बनला. त्याच्यासाठी अन्न नेले, तरी आईने ‘खा रे माझ्या बाळा’ असे सांगितल्याशिवाय तो तोंड लावत नसे. तो सतत तिच्या जवळ असे. जिथे तिच्या पायांना वेदना होत असत, तिथे तो आपला पंजा ठेवून बसायचा. कर्करोगामुळे आईच्या पाठीच्या असह्य वेदना वाढल्या की तो स्वतःही खाणे सोडून द्यायचा. आईच्या निधनाच्या एक वर्ष आधीच सीसूचा मृत्यू झाला. त्यानंतर आई जेव्हा त्याच्याशी संबंधित आठवणी सांगायची, तेव्हा त्या कथा आम्हाला हसवायच्याही आणि डोळ्यात पाणीही आणायच्या. फंडा असा की- माणसांसोबत राहणारे प्राणी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात, असे लोक म्हणतात, तेव्हा त्यासाठी मला कधीही पुराव्याची गरज वाटली नाही. कारण सीसूने आम्हाला हे सत्य खूप आधीच शिकवून ठेवले होते.

This post was originally published on this site.



शहर

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *