सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.

सिंधुदुर्ग: कणकवली मुलांना सरकारी खात्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी २४ लाख असे पाच मुलांचे १ कोटी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत कलमठ येथील सुनील दामोदर धुरे (वय ५९) यांनी तक्रार दिली. याप्रकरणी विनिता विवेक मुंज (रा. कणकवली, पटकीदेवी मंदिराशेजारी), सुबत्ता गिरीश माळी (रा. पुणे), मनोज जैन या तिघांविरुद्ध गंभीर आरोप केले असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी केली.

तक्रारीनुसार, सुनील धुरे हे जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथून नेत्र चिकित्सक अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले असून त्यांची पत्नी सुनिता धुरे या आरोग्य विस्तार अधिकारी आहेत. फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना त्यांची ओळख विनिता विवेक मुंज यांच्याशी झाली. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विनिता मुंज यांनी केंद्र शासनाच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया या विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नोकरीसाठी प्रत्येक उमेदवाराकडून २४ लाख रुपये लागतील असे सांगितले. विश्वासाने सुनील धुरे व त्यांच्या पत्नीने विविध टप्प्यांत विनिता मुंज यांना पैसे दिल्याचा दावा केला आहे. ११ डिसेंबर २०२४ रोजी आरटीजीएसद्वारे ६ लाख रुपये, त्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी आणखी ४ लाख रुपये पाठविण्यात आले. पुढे विविध वेळा रोख रक्कम, कर्ज, बचत व आरडी मोडून एकूण ४८ लाख रुपये दिले.

प्रशिक्षणासाठी दिल्लीला बोलावले
मुलांना दिल्ली येथे मेडिकल व प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर उमेदवारांना फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच नंतर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया या विभागांचे नियुक्तीपत्र पोस्टाने मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नोकरी लागली नाही. दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले असले तरी कोणतेही अधिकृत प्रशिक्षण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केवळ २ लाख परत मिळाले
वारंवार पाठपुरावा केल्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी १ लाख रुपयांचा धनादेश, तसेच ४ जून २०२६ रोजी ५० हजार रुपये रोख आणि ५० हजार रुपये यूपीआयद्वारे असे मिळून केवळ २ लाख रुपये परत मिळाले. उर्वरित ४६ लाख रुपये अद्याप परत मिळालेले नाहीत.
यांचीही झाली फसवणूक तक्रारीत इतर पालकांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रताप प्रभाकर दळवी यांनी २४ लाख रुपये (१० लाख आरटीजीएस व १४ लाख रोख), मनीषा मनोहर नाईक यांनी २४ लाख रुपये (९ लाख आरटीजीएस व १५ लाख रोख) आणि संतोष बाबाजी मसके यांनी २४ लाख रुपये रोख दिल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *