राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:काँग्रेसमधून फुटलेल्या पक्षांनी घरवापसी करायला हवी का?

भारतीय चित्रपटसृष्टीत सिक्वेल क्वचितच यशस्वी होतात. सहसा प्रेक्षकांनी मूळ चित्रपट पाहिलेला असतो, त्यामुळे त्यातील नावीन्य संपून जाते आणि कथा शिळी वाटू लागते. म्हणूनच ‘इंडिया-2.0’ चे पुन्हा एकत्र येणे हा विश्वास कष्टानेच निर्माण करते की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अनपेक्षित आव्हान देणारी आघाडी तशीच कामगिरी पुन्हा करू शकेल. गेल्या दोन वर्षांत बरेच काही बदलले आहे. काँग्रेसला अनेक मोठ्या राज्यांमध्ये निवडणुकीत धक्के बसले आहेत. आघाडीची ताकद असलेले अनेक प्रादेशिक पक्ष कमकुवत झाले आहेत. बंगालमधील पराभवानंतर टीएमसी विखुरण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात शिवसेना (उबाठा) आणि एनसीपी (शरद पवार गट) देखील फुटले आहेत. दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. अशा स्थितीत ‘इंडिया’ ही सामायिक दृष्टिकोनावर एकत्र आलेल्या शक्तींची एकजूट वाटण्यापेक्षा, 2029 मध्ये कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी जमलेल्या गर्दीसारखी अधिक वाटते. अडचण अशी आहे की, बंद खोलीत आघाड्या तयार केल्या जाऊ शकत असल्या तरी मतदार त्यातील संधीसाधूपणा ओळखतात. दोन महिन्यांपूर्वी राहुल गांधी टीएमसीवर भ्रष्टाचार आणि पडद्याआडून भाजपशी तडजोड केल्याचे आरोप करत होते. आता तेच नेते एका मंचावर येताना मतदार या विरोधाभासांकडे दुर्लक्ष करतील का? असे विरोधाभास सर्वत्र आहेत. तामिळनाडूतील पराभवानंतर आपल्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे डीएमके काँग्रेसवर नाराज आहे. आम आदमी पक्षदेखील पंजाबममध्ये काँग्रेससोबत मंच सामायिक करण्यासाठी फारसा उत्सुक दिसत नाही. केरळ निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या हल्ल्यांमुळे डावे पक्षही नाराज आहेत. अशा स्थितीत यातून एखाद्या एकजूट राजकीय पर्यायाचे चित्र क्वचितच समोर येते. याच्या उलट, भाजपमध्ये स्पष्टता आहे. मतदारांना माहीत आहे की पक्षाची तत्त्वे काय आहेत आणि अंतिम निर्णयाचा अधिकार कुणाकडे आहे. भाजपचे वर्चस्व या कारणामुळेही प्रस्थापित झाले आहे की, विरोधी पक्ष विखुरलेला, अनिश्चित आणि अंतर्गत संघर्षात गुंतलेला दिसतो. भारतीय राजकारणातील सर्वात मनोरंजक गोष्टींपैकी एक म्हणजे अनेक विद्यमान प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत. टीएमसी, एनसीपी आणि वायएसआर काँग्रेस- या सर्वांची मुळे काँग्रेसमध्येच आहेत. यांचे नेते नेतृत्वाचा वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा प्रादेशिक गरजांमुळे काँग्रेसपासून वेगळे झाले. परंतु हे पक्ष आजही आपल्या नावात आणि राजकीय ओळखीमध्ये काँग्रेसची छाप बाळगून आहेत. गेल्या चार दशकांत काँग्रेसचे कुटुंब अनेक प्रादेशिक पक्षांत विखुरले गेले. परिणामी, भाजपविरोधी मतांचे विभाजन होत गेले. तर मग, आणखी एक विखुरलेली भाजपविरोधी आघाडी बनवण्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या या शाखांना राजकीयदृष्ट्या पुन्हा संघटित करण्याचे मार्ग का शोधले जाऊ नयेत? विलीनीकरण किंवा किमान परस्पर समन्वयावर आधारित पद्धतशीर एकजूट, निवडणुकीच्या काही महिने आधी घाईघाईत बनवलेल्या कोणत्याही नवीन आघाडीच्या तुलनेत काँग्रेसला अधिक ऊर्जा देऊ शकते. यामुळे विरोधी पक्षांच्या राजकारणात एक मजबूत केंद्रीय धुरा तयार होईल आणि काँग्रेस लहान मित्रपक्षांसमोर कमकुवत स्थितीत नव्हे, तर ताकदीने आपली बाजू मांडू शकेल. आज हा विचार अव्यावहारिक वाटू शकतो. परंतु राजकारणाचा इतिहास अपेक्षेबाहेर वाटणाऱ्या अशा री-युनियनच्या घटनांनी भरलेला आहे. स्वतः भाजप हे व्यापक संघ परिवाराच्या दशके चाललेल्या एकत्रीकरणाचाच परिणाम आहे. मग काँग्रेस कुटुंब कायमचे विखुरलेले का राहावे? तथापि, अशा कोणत्याही यशासाठी काँग्रेसलाही बदलावे लागेल. प्रादेशिक नेत्यांच्या वापसीसाठी हे काँग्रेस नेतृत्वाने सत्ता, अधिकार सामायिक करण्याची मानसिकता दाखवावी. प्रादेशिक नेत्यांनाही वैयक्तिक अहंकार, कौटुंबिक हितसंबंध आणि अल्पकालीन राजकीय गणितांच्या पलीकडे जावे लागेल. एखादा नेता आपली दशकांची जुनी ओळख गमावून दिल्लीचा निव्वळ दरबारी बनून राहील हे शक्य नाही, पण प्रत्येक प्रादेशिक नेत्याने आपला घटता जनाधार असूनही राष्ट्रीय राजकारणात ‘किंगमेकर’ राहण्याची अपेक्षा करणेदेखील अवास्तव ठरेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एक विखुरलेली आघाडी बनवण्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शाखांना राजकीयदृष्ट्या पुन्हा संघटित करण्याचे मार्ग का शोधले जाऊ नयेत? विलीनीकरण, समन्वयावर आधारित एकजूट काँग्रेसला नवी ऊर्जा देऊ शकते.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *