पुणे: हट्टीपणा जीवावर बेतला! मित्र अन् पालकांचे कोणाचेही ऐकले नाही, भयंकर अपघातात चौघांनी गमावला जीव

पुणे: हायवेवरील एका ठिकाणी नाश्तानंतर एका मित्राने स्टेअरिंग घेतले, त्यामुळे इतरांनी "तू रात्री कार चालवू नकोस" असे बजावले. मात्र, त्याने ऐकले नसल्याने पुढे भयावह दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चारही मित्रांना जीव गमवावा लागला. जणूकाही मृत्यूची चाहूल त्यांना लागली होती.

नेहमीप्रमाणे माथेरानची पावले ओळखणारे हे तरुण या वेळी महाबळेश्वरकडे मोर्चा वळवत होते. पुणे जिल्ह्यातील मावळ व कामशेत येथील १३ मित्रांनी महाबळेश्वरची वारी आखली होती. एका मुलाच्या पालकांनी इतक्या लांब जाऊ नका, असे सांगून गाडी नाकारली होती. मात्र, त्या मुलाने ऐकले नाही आणि दोन्ही कारमधून १३ जण महाबळेश्वरकडे निघाले. गाडीत आनंदाच्या लहरी झुलत असताना कापूरव्होळला त्यांनी रात्री नाश्ता केला. नाश्त्यानंतर मयूर शिंदेने स्टेअरिंग हाती घेतले. मित्रांनी त्याच्या रात्री गाडी चालवण्यास नकार दिला होता, पण तो ऐकलाच नाही. भरधाव वेगात कार शिरवळ इथे दुर्घटनेला सामोरे जाऊन चारी मित्रांनी प्राण गमावले. "मित्रांचे ऐकले असते, तर सगळे मित्र आज हसतखेळत असते" असे बघणाऱ्यांच्या ओठांवर आहे.

महाबळेश्वर येथे मित्राचा वाढदिवस व पर्यटनासाठी निघालेल्या मित्रांच्या भरधाव कारवरील नियंत्रण सुटून कार रस्ता दुभाजकाला धडकत तीन ते चार वेळा पलटी होऊन विरुद्ध दिशेला येऊन मालट्रकला धडकली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शिरवळ हद्दीत सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.
वेदांत अर्जुन वारिंगे (वय १९, मूळ रा. वारंगवाडी, तळेगाव दाभाडे), निखिल बाळू राऊत (२०, रा. करंज, कामशेत), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, सध्या रा. कामशेत, ता. मावळ, मूळ रा. कानपूर), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ) अशी मृतांची नावे आहेत. दीक्षित दयानंद पुजारी (२०, रा. कामशेत), कारचालक मयूर हनुमंत शिंदे (२०, रा. बऊर, कामशेत), मालट्रक चालक शिवकुमार देवांगत (३६, रा. कुप्पेलुर, जि. हावेरी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारचालक मयूर शिंदे व दीक्षित पुजारी यांना तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मावळ तालुक्यातील कामशेत, बऊर, टाकवे, वारंगवाडी येथील १३ युवक दोन कारमधून मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता महाबळेश्वरला येत होते. मध्यरात्री कापूरव्होळ येथे नाश्ता करून दोन्ही कार महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी कार (एमएच १४ एलजे ३०३३) मयूर शिंदे चालवीत होता. ते शिरवळ हद्दीत आले असता मयूरचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्ता दुभाजकाला धडकत विरुद्ध पुणे रस्त्याच्या बाजूला येत तीन ते चार पलटी मारून बेडगी येथून सुरतला निघालेल्या मालट्रकला (केए २७ सी ५८७८) धडकली. धडक एवढी जोरदार होती की कारमधील वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड, निखिल राऊत हे जागीच ठार झाले तर तीनजण गंभीर जखमी झाले. कारचा चक्काचूर झाल्याने अडकलेले मृतदेह बाहेर काढताना तीन तासांहून जास्त वेळ लागला. गंभीर जखमींवर शिरवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पालकांनी कारची चावी काढली, यांनी दुसरी कार केली
मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता लहानपणापासूनचे जिवलग मित्र असलेल्या १३ मित्रांनी एकत्रित येत माथेरानला जाण्याचे नियोजन केले होते. ऐनवेळी एकाच्या पालकांनी कारची चावी काढून घेतल्याने संबंधितांचा हिरमोड झाला होता. मात्र मित्रांच्या आनंदावर विरजण पडू नये याकरिता तत्काळ मित्रांनी कारची व्यवस्था करीत माथेरानऐवजी महाबळेश्वरकडे जाण्याचे नियोजन केले. शिरवळ येथे काळाने घाला घातल्याने जीव गमवावा लागला.

 



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *