Asia Cup finals : चोर कुठले! सामन्यानंतर ट्रॉफीच नाही, भारतीय खेळाडूंची पदकंही गायब! BCCI चा पाकिस्तानवर आरोप

.

Asia Cup finals : भारत-पाकिस्तान एशिया कप 2025 च्या रोमांचक अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एक मोठा निर्णय घेतला. आशियाई क्रिकेट परिषद (ACC)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे प्रभावशाली नेते मोहसिन नकवी यांच्या विरोधात टीम इंडियाने स्पष्ट भूमिका घेतली

फायनल सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने त्यांच्याकडून एशिया कपची विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. या घटनेमुळे मैदानावर जवळपास दोन तास नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली. अखेर नकवी तेथून निघून गेले आणि ट्रॉफी आणि पदकंही कोणी तरी घेऊन गेलं.

BCCI ने लावले गंभीर आरोप

या सर्व प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, मोहसिन नकवी यांनी फक्त ट्रॉफीच नाही, तर भारतीय खेळाडूंसाठी ठेवलेली पदकंही बरोबर घेतली. बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणाचा मुद्दा पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत औपचारिकपणे मांडला जाईल.

 

ट्रॉफी आणि पदकं भारताला परत द्यावीत

देवजीत सैकिया यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, “आम्ही एसीसी अध्यक्षाकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. याचं कारण म्हणजे ते पाकिस्तानमधील एक प्रमुख राजकीय नेते आहेत. मात्र याचा अर्थ असा अजिबात नव्हता की, ते ट्रॉफी आणि पदकं स्वतःसोबत घेऊन जातील. ही अतिशय खेदजनक आणि अन्यायकारक गोष्ट आहे. आम्हाला अपेक्षा आहे की ट्रॉफी आणि पदकं शक्य तितक्या लवकर भारताला परत दिली जातील. याविरोधात आम्ही नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ICC परिषदेत औपचारिक निषेध नोंदवणार आहोत.”

याहून चांगला प्रत्युत्तराचा क्षण असू शकत नाही

सैकिया पुढे म्हणाले, “भारतीय सैन्याने सीमेवर ज्या धाडसी कारवाया केल्या आहेत, त्याचाच एक प्रकारचा प्रतिध्वनी आता दुबईत झाला आहे. त्यामुळे हा क्षण भारतीय क्रिकेटसाठी अतिशय अभिमानाचा आहे. पूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ झालं होतं आणि आता ‘ऑपरेशन किल्ला’ यशस्वी झालं. काही देशांनी केलेल्या हास्यास्पद कृत्यांना हे एक जोरदार प्रत्युत्तर आहे. त्यामुळे दुबईतील अंतिम सामन्याच्या त्या भव्य क्षणी याहून चांगलं उत्तर असूच शकत नव्हतं.”

पाकिस्तानविरुद्ध खेळण्यामागचं कारण स्पष्ट

सैकिया यांनी पुढे सांगितलं की बीसीसीआय नेहमीच भारत सरकारच्या धोरणानुसार, पावलं उचलतं. “भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 12-15 वर्षांपासून कोणतेही द्विपक्षीय सामने झालेले नाहीत आणि ही भूमिका कायम ठेवली आहे. मात्र सरकारने स्पष्ट धोरण आखलं आहे की, बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मग ते क्रिकेट असो किंवा फुटबॉल भारताला सहभागी व्हावंच लागतं. अन्यथा आंतरराष्ट्रीय महासंघांकडून संबंधित राष्ट्रीय संघटनांवर बंदी घालण्यात येऊ शकते. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *