पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.

पुणे: "पंढरीची वारी झाली, आता तुकोबांच्या चरणी परतलो.." या भावनेने आषाढी वारीनंतर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीक्षेत्र देहूनगरीत रविवारी (दि. ९ रोजी) दुपारी दोनच्या सुमारास परतली. पालखी वेशीवर येताच ग्रामस्थांसह देहू नगरपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा सभापती सुधीर काळोखे, कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, प्रशासन अधिकारी प्रियांका कदम यांनी तुकोबारायांच्या पालखीला हार अर्पण करून स्वागत केले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या नामस्मरणाने देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत भूमी देहूनगरीत परतला. पालखीचे आगमन होताच ग्रामस्थ, वारकरी, भाविक आणि विविध दिंड्यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखी रथाचे औक्षण..
पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. पालखी महाद्वार कमानीमध्ये आल्यानंतर परंपरेप्रमाणे तुपे कुटुंबीयांकडून दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखी रथाचे औक्षण करण्यात आले. तळवडे, विठ्ठलनगर, माळीनगर, चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, येलवाडी, सांगुर्डीसह पालखी सोहळ्यात सहभागी होऊ न शकलेल्या हजारो भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली. देहूतील प्रमुख मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. विविध दिंड्यांमधून सुरू असलेले अभंग गायन, टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसराला आध्यात्मिक वातावरण प्राप्त झाले होते.


पालखीच्या स्वागतानंतर देहूनगरीत पुन्हा एकदा तुकोबांच्या अभंगांचा आणि हरिनामाचा स्वर घुमला. पालखी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिर, बाजारआळी मार्गे जन्मस्थान मंदिर व विश्वंभर महाराज मंदिरासमोर आल्यानंतर 'श्री संताचीये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत' या अभंगाचे गायन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची आरती घेतली. वारीत सहभागी झालेल्या सर्व दिंड्यांच्या विणेकऱ्यांना व सेवेकरी यांना पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे व उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे व संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते मानाचा श्रीफळ प्रसाद देण्यात आला.

एकादशीच्या निमित्ताने देहूच्या देऊळ वाड्यात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे मंदिरात विधिवत महापूजा केली. भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. पालखी चिंचोली येथील शनी मंदिर परिसरातील पटांगणावर काही काळ विसावली. दुपारी एकच्या सुमारास पालखी संतभूमी देहूकडे मार्गस्थ झाली.



गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *