Akola Heavy Rain : बळीराजावर संकट! अकोल्याच्या पुंडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Akola : राज्यातील अनेक भागात कालपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. यातच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून तालुक्यातील पुंडा गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. यामुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली असून परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

तीन- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस होत असून अकोला जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अकोला जिल्ह्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. तर अकोट तालुक्यात काही गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पुंडा, सावरगाव, रोहनखेड, अकोलखेड, अंबोडा या गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.

शेतात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली

दरम्यान मुसळधार पावसामुळे कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेत शिवार परिसरात पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

तातडीने पंचनामे करण्याची मागणी

ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. यात पिके पाण्याखाली गेल्याने या गंभीर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. आधी मागील ८ऑगस्टला झालेल्या पावसाचे पंचनामे देखील अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याचे काही शेतकऱ्याचे म्हणणे आहे. यानंतर पुन्हा नुकसान झाले आहे.

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *