नगर रस्ता कोंडीमुक्त होणार कधी? नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा; वाहतुकीच्या जंजाळाने नागरिक त्रस्त

पुणे शहर आणि उपनगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही आता सामान्य नागरिकांसाठी आणि चाकरमान्यांसाठी रोजची डोकेदुखी बनली आहे. पुणे-अहिल्यानगर (नगर) रस्त्यावरील भीषण वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, "शहरातील रस्ते वाहतूक कोंडीमुक्त कधी होणार?" असा संतप्त सवाल प्रशासनाला विचारला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि वाहतूक नियंत्रणाच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी जर तातडीने योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा थेट इशारा दिला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वाघोली आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, चाकरमान्यांची रेलचेल आणि दिवसेंदिवस रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या यामुळे येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. वाघोली हा भाग मराठवाडा आणि विदर्भाचे प्रमुख प्रवेशद्वार मानला जातो, त्यामुळे येथून दिवसभर लाखो वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, प्रत्यक्षात प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणाचा तीव्र अभाव जाणवत असून, योग्य पोलीस बंदोबस्त किंवा नियंत्रक यंत्रणा नसल्यामुळे पुणे-अहिल्यानगर रोडवर दोन्ही बाजूंना तब्बल तीन-तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळते.

या भीषण वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचा आणि प्रवाशांचा दररोज तासनतास वेळ वाया जात असून, अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होत आहे. या समस्येचे गांभीर्य तेव्हा अधिक वाढते जेव्हा या कोंडीमध्ये शाळकरी मुलांच्या स्कूल बसेस आणि जीवनावश्यक सेवा देणाऱ्या आपत्कालीन गाड्या अडकून पडतात. स्थानिकांच्या मते, या तीन किलोमीटरच्या ट्रॅफिक जाममध्ये अनेक वेळा चार-चार रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांच्या जीवालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी आणि स्थानिक वाहनचालकांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली आहेत. वाहतूकुकीचे नियोजन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमुख चौकांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याचे कठोर निर्देश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. वाघोलीतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता, पुणे पोलीस आयुक्तांनी या भागात दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह किमान ५० वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. जर प्रशासनाने या गंभीर समस्येकडे यापुढेही दुर्लक्ष केले, तर वाघोलीकर नागरिक आणि वाहनचालकांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *