गोवा: गणेशोत्सवाला 'ओमकार' हत्तीच्या त्रासाचे ग्रहण; गणपतीची आरती करायची की पिके वाचवायची? शेतकरी आक्रमक

गोवा: सध्या सर्वत्र अत्यंत उत्साहात आणि आनंदाने गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात असतानाच, पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांवर मात्र मोठे संकट ओढवले आहे. 'ओमकार' नावाच्या जंगली हत्तीने मोपा, तांबोसे, तोर्से आणि कलशी या भागांत पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि बागायती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात हत्तीने केलेल्या या भीषण तांडवामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर पूर्णपणे विरजण पडले आहे. घरोघरी गणपती बाप्पाची पूजा, आरती आणि आनंदोत्सव सुरू असताना दुसरीकडे हत्ती आपल्या पिकांची नासाडी करत असल्याने शेतकऱ्यांना शेताची राखण करण्यासाठी दिवस-रात्र धावावे लागत आहे.

गेल्या काही काळापासून या भागातील शेतकऱ्यांना जंगली हत्तीच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. यंदा बाप्पाच्या आगमनापूर्वीच 'ओमकार' हत्तीने पुन्हा एकदा हजेरी लावून तयार झालेली पिके, केळीच्या बागा आणि इतर पिकांची माती केली आहे. वर्षानुवर्षे रक्तआटवून व कर्जे काढून लावलेली झाडे आणि पिके एकाच रात्रीत तुडवून नष्ट केली जात असल्याने जगायचे कसे, असा सवाल हतबल झालेले शेतकरी विचारत आहेत. "एका बाजूला घरात गणपतीची आरती करायची की दुसऱ्या बाजूला पोटच्या पाल्यासारख्या जपलेल्या शेतीला आणि पिकांना वाचवण्यासाठी हत्तीच्या मागे पळायचे?" असा उद्विग्न सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. केवळ नुकसान भरपाई देऊन प्रश्न सुटणार नाही, तर प्रशासनाने यावर तात्काळ एखादा शाश्वत आणि कायमस्वरूपी उपाय शोधायला हवा, अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

 

 

या संपूर्ण प्रकरणावरून गोवा आणि महाराष्ट्र शासनाच्या वनविभागावरही तीव्र टीका होत आहे. हत्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हुकूमून ढकलला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. जेव्हा हत्ती महाराष्ट्रात जातो तेव्हा त्याला गोव्याच्या दिशेने हाकलले जाते आणि गोव्यात आल्यावर पुन्हा महाराष्ट्राकडे ढकलले जाते, या सीमावर्ती राज्यांच्या लपंडावात मात्र सीमाभागातील गरीब शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाचे अधिकारी केवळ तात्पुरत्या स्वरूपात हत्तीला एका गावातून दुसऱ्या गावात पळवण्याचे काम करत असून त्यांच्याकडे कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री किंवा तज्ज्ञ व महावत नाहीत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातही शेतकऱ्यांना उद्विग्नतेत जगावे लागत असून, सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *