साताऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी; गावात तणावाचे वातावरण, अखेर २ मंडळांनी केलं दीड दिवसांत गणेश विसर्जन!

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील पाल येथे दोन तरुणांच्या गटांत झालेल्या मारामारीमुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या वादाच्या कारणावरून दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यात सहा जण जखमी झाले असून वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून पोलिसांनी तब्बल १४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

जुन्या वादातून उफाळली हाणामारी: मिळालेल्या माहितीनुसार, पाल गावातील दोन गटांत जुना वाद होता. गणेशोत्सवाच्या काळात हाच जुना वाद पुन्हा उफाळून आला. दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांवर काठ्या, लाकडी दांडके आणि लोखंडी वस्तूने हल्ला केला. या घटनेत ओमकार पवार, प्रमोद शिंदे, पृथ्वीराज शिंदे, शुभम भोसले यांच्यासह इतर नागरिक जखमी झाले. तसेच घटनेदरम्यान कार आणि दुचाकी अशा दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली.

गावातील तणाव शांत करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गणेशोत्सवाच्या उर्वरित काळात गावात तणाव वाढू नये आणि शांतता सुव्यवस्थित राहावी, यासाठी पोलिस अधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या सामंजस्याच्या निर्णयानुसार, वाद मिटवण्यासाठी दोन्ही गणेश मंडळांनी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार विसर्जन पार पाडले.

पोलीस बंदोबस्त आणि कारवाई: गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परस्परविरोधी फिर्यादीवरून पोलिसांनी १४ संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास उंब्रज पोलिस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *