शिरूर, पिंपरखेड: वीज गेली की जीव टांगणीला! बिबट्यांच्या दहशतीत जगणाऱ्या बेट ग्रामस्थांची मंत्र्यांकडे धाव.

शिरूर, पिंपरखेड दि. १० (प्रफुल्ल बोंबे ): शिरूर तालुक्यातील फाकटे, चांडोह, टाकळी हाजी, वडनेर, म्हसे, सरदवाडी आणि माळवाडी गावांमध्ये सुरू असलेल्या वारंवार वीज कपातीविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची लेखी मागणी केली. यावेळी परिसरातील बिबट्यांचा वाढता वावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यांची सविस्तर माहिती मंत्र्यांसमोर मांडण्यात आली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा, पिकांची देखभाल आणि दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून पालकांमध्ये नाराजी वाढत आहे. परिसरात बिबट्या व सर्पांचा वावर असल्याने रात्रीच्या अंधारात नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्यामुळे रस्ते, शेतमळे आणि वस्ती परिसर अंधारात बुडत असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा तसेच अपघातांचा धोका वाढत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यापूर्वीही महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आणि निवेदने देण्यात आली होती. मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर ग्रामस्थ, सरपंच, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला. निवेदनात फाकटे व पंचक्रोशीतील गावांमधील रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करणे, नियमित व अखंडित वीजपुरवठा करणे आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, १० जून रोजी शिष्टमंडळाने बारामती येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी दिली. परिसरातील नागरिकांना लवकरच लोडशेडिंगच्या समस्येतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

"बिबट्यांचा धोकाही वाढतोय, विद्यार्थ्यांचा अभ्यासही अंधारात जातोय आणि शेतकऱ्यांची शेतीही संकटात सापडतेय... आता तरी रात्रीचे लोडशेडिंग थांबणार का? बेट भागातील हजारो नागरिकांचा सवाल प्रशासनासमोर उभा ठाकला आहे!"



शहर

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *