मुंबईत भाषेवरून मोठा वाद: कांदिवलीत मराठी रिक्षाचालकाला मारहाण, सक्तीच्या विरोधात अमराठी चालकांचे आंदोलन अन् संतप्त पडसाद

मुंबई: महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरून मुंबईत सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. आरटीओ (RTO) कडून चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी मोहीम राबवली जात असतानाच, या निर्णयाच्या विरोधात परप्रांतीय आणि अमराठी रिक्षाचालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच वादातून मुंबईतील कांदिवली पश्चिम भागात एका मराठी रिक्षाचालकाला प्रवाशांची वाहतूक करत असताना अमराठी चालकांनी बेदम मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून राजकीय वातावरण तापले आहे.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांना मराठी भाषेचे प्राविण्य असावे यासाठी २० ऑगस्टपासून राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी नियम न पाळणाऱ्या किंवा मराठीचे ज्ञान नसलेल्या हजारो चालकांना नोटीसा बजावल्या आहेत. या मोहिमेच्या निषेधार्थ काही अमराठी आणि परप्रांतीय रिक्षाचालक संघटनांनी मुंबईत तीन दिवसांच्या बंदची व संपाची हाक पुकारली.

कांदिवली पश्चिमेकडील एम. जी. रोड आणि लालजीपाडा परिसरात संपावर असलेल्या काही परप्रांतीय रिक्षाचालकांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको केला आणि इतर चालकांना प्रवाशांची ने-आण करण्यापासून बळजबरीने रोखले. दरम्यान, प्रकाश शेजवळ नावाचे एक मराठी रिक्षाचालक प्रवाशांना घेऊन जात असताना संपात सहभागी झालेल्या काही मुजोर चालकांनी त्यांची रिक्षा अडवली. संप सुरू असताना प्रवाशांची वाहतूक का करत आहेस, असा जाब विचारत संतापलेल्या अमराठी चालकांनी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्यावर शारीरिक हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

"भोजपुरी बोलू, हिंदी बोलू, पण मराठी बोलणार नाही" - अमराठी चालकांची भाषा

या आंदोलनादरम्यान काही परप्रांतीय रिक्षाचालकांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत मुजोरीची भाषा वापरली. “आम्ही ५०-६० वर्षांचे वृद्ध आहोत, कधी शाळेत गेलो नाही, त्यामुळे अचानक मराठी कशी बोलणार? आम्ही हिंदी आणि भोजपुरी बोलू, पण मराठी बोलणार नाही,” अशी भूमिका काही चालकांनी जाहीरपणे मांडली. तसेच या भाषिक सक्तीच्या विरोधात त्यांनी न्याय मिळेपर्यंत तीन दिवस गाड्या बंद ठेवण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे मुंबईतील अनेक भागांत प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागला. आंदोलकांनी प्रवाशांना बळजबरीने रिक्षातून खाली उतरवल्याचेही समोर आले आहे.

मनसे आक्रमक आणि पोलिसांची कारवाई

मराठी रिक्षाचालकाला मारहाणीची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि इतर स्थानिक कार्यकर्ते तात्काळ आक्रमक झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत मुजोरी करणाऱ्या अमराठी चालकांना जाब विचारला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत या प्रकरणी कारवाई केली असून, मराठी रिक्षाचालकाला मारहाण केल्याप्रकरणी सुरेश यादव, महेंद्र यादव, अनिल कुमार यादव आणि नुरुल अन्सारी या चार परप्रांतीय रिक्षाचालकांना ताब्यात घेतले आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *