पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील झपाट्याने विकसित होणाऱ्या वाकड परिसरात स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चौधरी पार्क तसेच यमुनानगर रोड परिसरातील काही नागरिक, रस्त्यावरील फेरीवाले आणि दुकानदारांकडून रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने परिसराला अक्षरशः कचऱ्याचे हब स्वरूप प्राप्त होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यावर भटक्या कुत्र्यांकडून ताव मारला जात असल्याने कचरा रस्त्यावर सर्वत्र पसरतो. यामुळे परिसरात अस्वच्छतेबरोबरच दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी आणि पावसाळ्यात या समस्येची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

कचरा टाकण्याची समस्या केवळ नागरिकांपुरती मर्यादित नसून काही फेरीवाले आणि दुकानदारांकडूनही व्यवसायानंतर निर्माण होणारा कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने केवळ कचरा उचलण्यावर भर न देता कचरा कुणाकडून आणि कुठे टाकला जात आहे, यावरही लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

महापालिका कर्मचारी उपलब्ध नसल्याची नागरिकांची तक्रार

परिसरात कचरा साचूनही अनेक वेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, कचरा काही काळ तसाच पडून राहतो आणि भटकी कुत्री तसेच इतर प्राणी तो परिसरभर पसरवतात.

नागरिकांच्या मते, नियमित कचरा संकलनाबरोबरच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली तरच या समस्येला आळा बसू शकतो. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरात विशेष पाहणी करून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक, फेरीवाले आणि दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

‘नो पार्किंग’चे बोर्डच गायब; वाहतूक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, यमुनानगर रोड परिसरात स्वच्छतेसोबतच पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या रस्त्यावर महापालिका अथवा संबंधित प्रशासनाने लावलेले अनेक ‘नो पार्किंग’चे फलक आजूबाजूला राहणाऱ्या काही नागरिकांनी काढून टाकल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

स्वतःच्या वाहनांना रस्त्यावर पार्किंग करता यावे, यासाठी नो पार्किंगचे फलक हटविले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. फलकच नसल्यामुळे रस्त्यावर बेकायदा पार्किंग होत असले तरी त्याविरोधात तक्रार करताना नागरिकांना अडचणी येत आहेत.

विशेष म्हणजे, नो पार्किंगचा अधिकृत फलक नसल्यामुळे PTP App वरही अशा पार्किंगविरोधात तक्रार नोंदविण्यात अडथळा येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने गायब झालेले किंवा काढून टाकलेले नो पार्किंग फलक तातडीने पुन्हा बसवावेत, तसेच ते जाणीवपूर्वक हटविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

एकीकडे कचरा, दुसरीकडे बेकायदा पार्किंग

चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिकांना एकाच वेळी स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, त्यावर फिरणारी भटकी कुत्री, निर्माण होणारी दुर्गंधी आणि त्याच परिसरात होणारी अनधिकृत पार्किंग यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

महापालिकेने या परिसराकडे केवळ तक्रार आल्यानंतर स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून न पाहता नियमित निरीक्षण, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, वेळेवर कचरा संकलन आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती या सर्व उपाययोजना एकत्रितपणे राबविण्याची गरज आहे.

तसेच यमुनानगर रोडवरील नो पार्किंग व्यवस्था पुन्हा प्रभावी करण्यासाठी हटविलेले फलक तातडीने बसविणे, बेकायदा पार्किंगवर कारवाई करणे आणि PTP App वर तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

वाकडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या परिसराची ओळख केवळ मोठ्या इमारती आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नव्हे, तर स्वच्छ आणि शिस्तबद्ध परिसर म्हणूनही व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *