यवतमाळ: शेवटचा प्रवासही धोकादायक! अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पुलावरून मृतदेह नेण्याची वेळ; प्रशासनाचा अनास्था कारभार चव्हाट्यावर

यवतमाळ: जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी खडतर प्रवास अशी विदारक परिस्थिती महागाव तालुक्यातील माळवागद येथील आहे. गावाला अद्याप हक्काची स्मशानभूमी अन् तिथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे नातेवाईकांना नाल्याच्या पुरातून मृतदेह न्यावा लागत आहे. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना नाल्याच्या पाण्यातून मृतदेह डोक्यावर घेऊन मार्गी काढावा लागला. यामुळे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


माळवागद गावाचा समावेश पुसद विधानसभा मतदारसंघात होत असून राज्यमंत्री इंद्रनील नाईक या भागाचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, गावकऱ्यांची वर्षानुवर्षाची स्मशानभूमी व रस्त्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. पावसाळ्यात गावातून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेणेही धोकादायक बनत आहे. शुक्रवारी घडलेल्या घटनेने या समस्येचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले.


गावात हक्काची स्मशानभूमी नसणे हा केवळ विकासाचा प्रश्न नसून तो माणसाच्या मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याच्या मूलभूत अधिकाराशी संबंधित विषय आहे. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून स्मशानभूमीसाठी जागा व रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. माळवागद येथील सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक मधुकर राठोड, पृथ्वीराज चव्हाण, माजी सरपंच मोहन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र, ग्रामस्थांचा प्रश्न निकाली काढण्यात कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे संतापाची धार अधिक तीव्र झाली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *