मालेगाव: मुले तापाने फणफणली; उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडल्याने रुग्णालयाच्या जमिनीवर टाकाव्या लागल्या गाद्या!

मालेगाव: महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने शहरात संसर्गजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढली आहे. एकट्या सामान्य रुग्णालयात डेंग्यू, मलेरिया, व्हायरलसदृश विविध प्रकारच्या तापाचे १३५ रुग्ण निरीक्षणाखाली उपचार घेत आहेत. बालरुग्ण कक्ष क्षमता २५ खाटांची असताना येथे ५२ बालके दाखल आहेत. खाटा कमी पडत असल्यामुळे जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांना उपचार दिले जात आहेत. दरम्यान, खाजगी रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.

सामान्य रुग्णालयातील दैनंदिन बाह्य रुग्ण तपासणी कक्षात सरासरी ४५ टक्के रुग्णसंख्या वाढली आहे. यात सर्वाधिक रुग्ण अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, पायांची आग, ताप, तोंडाची चव गेलेली या लक्षणांची आहेत. बुधवारी (दि. २) तब्बल १३०४ रुग्णांनी बाह्य रुग्ण कक्षात औषधोपचार घेतले. सरासरीपेक्षा सुमारे चारशे रुग्ण अधिक आले. यात निव्वळ तापाचे १३५ रुग्ण असून या सर्वांना रुग्णालयात ऍडमिट करून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर निरीक्षणाखाली उपचार केले जात आहेत. पेशी कमी-जास्त, मलेरिया, डेंग्यू, सदृश्य ताप, व्हायरल इन्फेक्शन या प्रकारातील हे सर्व रुग्ण आहेत.

काविळचे पाच रुग्ण
दूषित अन्न अथवा दूषित पाणी प्यायल्यामुळे होणाऱ्या कावीळचे पाच रुग्ण दाखल आहेत. ही सर्व लहान बालके आहेत. सर्वांची प्रकृती नियंत्रणात असली तरी सध्या पिण्याचे पाणी वापरताना काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सामान्य रुग्णालयाकडे पुरेसा औषध साठा आहे. रक्ताच्या सर्व चाचण्या केल्या जातात. वैद्यकीय स्टाफ कमी असला तरी रुग्णांना सेवा देण्यात अडचण नाही. नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. पाणी उकळून व गाळूनच प्यावे. झोपताना डास प्रतिबंधक साधने वापरावीत. शक्यतो मच्छरदाणीचा वापर करावा. घरातील ज्येष्ठ तसेच बालकांकडे अधिक लक्ष द्यावे.

डॉ. योगेश पाटील,
वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *