एन. रघुरामन यांचा कॉलम:शहराचे मन गावासारखे कधीच असू शकत नाही

“आजी, मी शाळेत जातोय!’ असं मी दररोज सकाळी दारातून ओरडायचो. त्यावर तिचा तो धारदार पण प्रेमळ आवाज यायचा: “मी किती वेळा समजावून सांगू? ‘जातोय’ असं कधीच म्हणू नकोस, फक्त ‘शाळेत जाऊन परत येईन’ असं म्हण.’ मी तिच्याकडे पाहिल्याशिवाय कधीच राहायचो नाही, “काय फरक पडतो’ आणि ती जे म्हणाली होती तेच पुन्हा म्हणून मी पळून जायचो. ते दोन शब्द-”मी येतोय’-सुरक्षितता आणि आश्वासनाचा एक अलिखित करार होता. ज्यावर आमचे वडीलधारी विश्वास ठेवत असत. त्यांना दारात उभे राहून हात हलवण्याची किंवा चुंबन पाठवण्याची गरज नव्हती. आम्ही निघताना ते आमच्याकडे काळजीयुक्त नजरेने पाहत नसत. हे ते दिवस होते जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते. आणि तरीही आम्हाला कशाचीही कमतरता नव्हती. ते आम्हाला अनवाणी आणि मोकळ्या मनाने जगात जाऊ देत. या विश्वासाने की गाव आम्हाला सुखरूप परत आणेल. आमचे पाय चिखलाने माखले तरी आम्ही रडत नसू. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या हातपंपावरून पाणी काढायचो. अंगावरची धूळ झटकून टाकायचो आणि वर्गाच्या जमिनीवर मांडी घालून बसायचो. त्या काळी, आम्हाला आमच्या प्रगतिपुस्तकाची (रिपोर्ट कार्डची) चिंतासुद्धा नव्हती. उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण एवढंच महत्त्वाचं होतं. मोठ्यांकडून बोलणी खाणं ही रोजचीच गोष्ट होती; त्यामुळे कोणताही मानसिक आघात होत नसे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने खोडसाळपणाबद्दल आमचे कान पिळले, तर आम्ही वकील शोधायला धावत नसायचो-आम्ही ते सहज स्वीकारायचो. गावात सामाजिक पालकत्वाची पद्धत होती. आम्ही सर्वांचेच होतो. तेव्हा आमच्यासाठी सर्वात मोठी शरमेची गोष्ट कोणती होती? शिकवणीला (ट्युशनला) जाणं. 1960 च्या दशकात, अतिरिक्त वर्गांचा अर्थ असा होता की, एखादी गोष्ट पहिल्याच प्रयत्नात समजण्याइतके तुम्ही हुशार नाही. आणि आमची सर्वात मोठी चैन कोणती होती? सायकलच्या पुढच्या दांड्यावर किंवा गंजलेल्या कॅरियरवर बसून धुळीच्या वाटेवरून वेगाने सायकल चालवणे आणि फळे तोडण्यासाठी सायकलचा शिडीसारखा वापर करणे. तेव्हा आम्हाला वाटायचं की जणू आम्ही जग जिंकलं आहे. ते दिवस होते जेव्हा सर्वात मोठ्या आशा जुन्या पुस्तकांमध्ये होत्या. आम्ही पुस्तकांच्या पानांमध्ये मोराची पिसे आणि वाळलेली पिंपळाची पाने खोचत असू. या भोळ्या विश्वासाने की त्यामुळे आम्ही अधिक शहाणे होऊ. त्या नाजूक, सांगाड्यासारख्या दिसणाऱ्या पानांमध्ये-जी एखाद्या ललित कलेसारखी वाटत होती. रुजलेली ही श्रद्धा आम्हाला अशी एक गोष्ट देत असे, जी शहरांमध्ये क्वचितच मिळते-शुद्ध, निर्भेळ आशा. त्या काळी, प्रत्येक पाठ्यपुस्तकाला तपकिरी रंगाचे कव्हर असायचे आणि ती कापडी पिशव्यांमध्ये व्यवस्थित ठेवली जात असत. कारण ती फक्त आमची नव्हती. पुढच्या वर्षी ‘जुनी’ पुस्तके म्हणून विकण्यासाठी ती जपून ठेवावी लागत असत. त्यानंतर अभ्यासक्रम बदलेपर्यंत, मी आठवीपर्यंत जुन्या पुस्तकांचा वापर करूनच शिकलो. तरीही, आमच्या आई-वडिलांनी अभ्यासाच्या ओझ्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. आयुष्य निश्चितच मर्यादित होते, पण आम्हाला कधीही गरिबी जाणवली नाही. दक्षिण भारतातील ‘मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभकोणममध्ये-जिथे मी माझे बालपण, प्राथमिक शिक्षणासह, घालवले-संस्कृती पाठ्यपुस्तकांमधून शिकवली जात नव्हती; ती मातीत खोलवर रुजलेली होती. प्रत्येक गल्ली आणि वस्तीत मंदिरे असल्याने, ते रस्तेच पवित्र वाटत असत. रस्त्यावर थुंकण्याची, कचरा टाकण्याची किंवा तो प्रदूषित करण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. याचे कारण म्हणजे एक अदृश्य सामाजिक धागा आम्हाला एकत्र बांधून ठेवत होता-भूमी, वडीलधारी मंडळी, प्राचीन मंदिरे आणि बारमाही कावेरी नदी यांच्याबद्दलचा आदर. निसर्ग आमच्यासाठी शोषण करण्याचे साधन नव्हता; उलट, ती आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली एक देवी होती. शनिवारी जेव्हा मी वाचले की गोव्यातील 56 गावांतील लोक, त्यांना ‘शहरी क्षेत्र’ म्हणून पुनर्वर्गीकृत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. फंडा असा की... आधुनिक शहरे कधीही घरासारखी शांतता निर्माण करू शकत नाहीत, जिथे एखादे मूल ‘मी जाऊन परत येतोय’ असे म्हणू शकेल आणि त्याला खात्री असेल की ‘सामाजिक पालक’ त्याची काळजी घेण्यासाठी आहेत. आज, जेव्हा मी शहरांमधील गर्दीने भरलेले पण उदासीन रस्ते पाहतो. तेव्हा मला जुन्या दिवसांतील सुरक्षिततेची आठवण येऊ लागते.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *