बलराज संघई यांचा कॉलम:जीव आणि अजीव स्वतंत्रच, भौतिकतेच्या मागे लागून उपयोग नाही

एक विचार असा आहे, जे होत आहे ते होऊ द्या. जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करु नका. प्रकृतीची लीला, नियतीची इच्छा समजून त्या कडे त्रयस्थ, तठस्थ भावनेने पहा. हाच सुखाचा मार्ग असू शकतो. चांगले किंवा वाईट काहीच नाही. होत आहे ते होऊ देणे. येथे हरवून जावे असे तुमचे काय आहे? सर्व प्रकृतीचे आहे, निसर्गाचे आहे. आपला काहीच अधिकार नाही. म्हणून प्रत्येक घटनेचे फक्त साक्षी व्हा. सुख-दुःखाच्या पलीकडे जाण्याचा हाच मार्ग आहे. प्रत्येक जीव हा त्याचा स्वतःचा असतो. कारण चैतन्य स्वतंत्र असते. ते इतर कोणाच्याही मालकीचे नसते. तसेच प्रत्येक अजीव म्हणजेच भौतिक पदार्थ हा त्याचा स्वतःचा असतो. जीव आणि अजीव ह्या दोन स्वतंत्र राशी विश्वामध्ये अस्तित्वात आहेत, याशिवाय तिसरा पदार्थ नाही. आणि मुख्य म्हणजे हे दोन्हीही स्वतः स्वतंत्र अस्तित्वात आहेत. जीव अजीवाचा कधीही होऊ शकत नाही आणि अजीव हा कधीही जीवाचा होऊ शकत नाही हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. आपण जे पंचमहाभूत म्हणतो तेच अजीव किंवा भौतिक पदार्थाचे सर्व प्रकार. परंतु एक सत्य आहे की जीव हा अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. जीवामध्ये चैतन्य असते म्हणून अनेक प्रवृत्ती असतात. अजीवामध्ये चैतन्याचा अभाव असल्यामुळे प्रवृत्ती नसतात. मात्र अजीवाचे काही मूलगुण असतात. जसे स्पर्श, वर्ण, गंध, रस अर्थात गरम किंवा थंड असणे, कोणता तरी रंग असणे, त्याला चव असणे, नियमित किंवा अनियमित आकार असणे आणि खंडित होणे किंवा एकत्र जुळणे. हे सर्व अजीव पदार्थाच्या मूळ लहानात लहान सूक्ष्म कणाचे गुणधर्म असतात. हे सर्व एकत्र होऊन मोठा पदार्थ होतो. चैतन्य आत्मा जेव्हा संसारात असतो, तेव्हा कर्मजनीत अवस्थेमुळे त्याच्या काही प्रवृत्ती असतात. संसारात असलेल्या जीवाला जीवन जगण्यासाठी वस्तूंची आवश्यकता पडते. म्हणजेच तो अजीवाच्या सहाय्याने जीवन जगतो. हा जीव आणि अजीव यांच्यातील परस्पर सह-अस्तित्वाचा सिद्धांत आहे. इतके माहीत असल्यानंतरही मनुष्य भौतिक वस्तूंचा लोभ, मोह, संग्रह करतो. भौतिक पदार्थांच्या,वस्तूंच्या प्राप्तीसाठी जीवनातील महत्त्वाचा सर्व वेळ खर्च करतो. त्याचे कारण हेच की तो भौतिकते मध्ये सुख शोधत असतो. परंतु खूप मेहनत, कष्ट आटापिटा केल्यानंतरही ज्यावेळेस तो भौतिकतेच्या मागे थकून भागून अखेर स्थिरावतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खरे सुख हे वस्तूंच्या मागे भौतिकतेच्या मागे पर-पदार्थाच्या मागे धावण्यात, पळण्यात, त्यांना मिळवण्यात नसून ते आपल्या अंतरात आहे. सुख हे समाधानात आहे. आपल्या मानण्यात आहे. समभावात जगण्यात आहे. म्हणजेच खरे सुख हे अंतरातील संतोष वृत्ती मध्ये आहे. म्हणून असे म्हणावे वाटते की निसर्ग आणि नियतीच्या इच्छेनुसार जीवन जसे चालले आहे तसे चालू द्या. त्यात फार बाधा उत्पन्न करण्याचे कारण नाही. अविचल आणि संतुलित, संतोष आणि समाधानी, अर्थात समभावाने जीवन जगण्यातच खरे सुख, समाधान आहे हे जाणून घ्यावे. (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *