एन. रघुरामन यांचा कॉलम:आपला प्रवास एकटेपणाचा सामना करत आहे का?

ते दिवस आठवतात, जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवास करत असे? तेव्हा प्रवास म्हणजे केवळ एखाद्या मुक्कामावर पोहोचणे नसायचे. तो एक सोहळा असायचा, त्यात एक थ्रील असायचे आणि बहुतांश वेळा ती एक चालती-फिरती पिकनिकच असायची. लहानपणी आम्ही ट्रेनच्या खिडकीला चिकटून बसायचो आणि पुढच्या स्टेशनची वाट पाहायचो. ट्रेनचा वेग कमी होताच आमचे तरुण वडील प्लॅटफॉर्म नसलेल्या स्टेशनवर उतरायचे. आम्हा मुलांना खाली उतरण्याची परवानगी नसायची. ते फूड-कार्टच्या दिशेने धावायचे आणि आमच्यापैकी कोणीतरी ओरडायचे, ‘बाबा, ते नाही! त्याच्या बाजूला जे पिवळे पाकीट आहे, ते!’ असे करून आम्हाला नेमके कोणते बिस्किट हवे आहे, हे आम्ही अचूक सांगायचो. कोळशाच्या इंजिनची लांब शिट्टी वाजण्यापूर्वी वडिलांना परत यावे लागायचे. शिट्टी वाजायची, तेव्हा आम्ही सगळे मिळून गाऊ लागायचो- ‘गाडी बुला रही है, सीटी बजा रही है!’ आजूबाजूला बसलेले प्रवासी आमच्या या बालिशपणावर हसायचे. 1960 च्या दशकातील प्रवास असाच असायचा : खा, वरच्या बर्थवर चढा, काही मिनिटे झोपण्याचे नाटक करा, मग खाली उतरून पुन्हा खा. वडील बिस्किटाचे पाकीट आमच्या हातात देताच आम्ही त्यावर तुटून पडायचो आणि दातांनी त्याचे रॅपर फाडायचो. तेव्हा आई लगेच आमच्या पाठीत धपाटा घालायची आणि म्हणायची, ‘सगळंच तोंडाला लावाल तर आजारी पडाल!’ ती पाकीट हिसकावून स्वतःजवळ ठेवायची, फ्लास्कमधून स्टीलच्या ग्लासमध्ये गरम दूध ओतायची आणि आम्ही बिस्किटे त्यात बुडवून खाऊ लागायचो. आम्हाला कधीच पर्वा नसायची की बिस्किट कोणत्या ब्रँडचे आहे, त्यात कोणते घटक आहेत किंवा किती कॅलरी आहेत. रिकामे रॅपर पाहून आमचा एकच प्रश्न असायचा : आणखी एक बिस्किट उरले आहे का? जर उत्तर ‘नाही’ असेल, तर रिकामे पाकीट लगेच चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले जायचे. कधी कधी ते पाकीट हवेत उडून समोर बसलेल्या काकांच्या खिडकीतून आत जायचे आणि ते पकडायचे. तेव्हा ते आमच्याकडे अशा नजरेने पाहायचे, जणू काही म्हणत आहेत : ‘बॅड हॅबिट्स’. आम्हीही लगेच ‘सॉरी’ म्हणायचो. त्या काळात ट्रेनचा डबा एखाद्या छोट्याशा वस्तीसारखा असायचा. आम्ही सहा सीट असलेल्या कोणत्याही डब्यात जायचो आणि तिथे अगदी अनोळखी लोकही आमचे स्वागत करायचे. कोणी आम्हाला खाण्यासाठी काहीतरी द्यायचे. आम्ही नम्रपणे नकार द्यायचो आणि पळून आमच्या आई-वडिलांकडे परत यायचो. आता 2026 मध्ये येऊया. गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून प्रवास करताना अचानक मला जाणवले की, घरातून बाहेर पडल्यापासून मी एकाही व्यक्तीशी बोललो नव्हतो. टॅक्सी प्री-पेड होती, त्यामुळे ड्रायव्हरने मला निमूटपणे एअरपोर्टच्या प्रवेशद्वारावर उतरवले. डिझियात्रा ॲपने माझा चेहरा ओळखला, त्यामुळे एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी तैनात सीआरपीएफ जवानांशीही मला बोलण्याची गरज पडली नाही. इंडिगोच्या किऑस्कवर मी माझी सुटकेस स्वतःच चेक-इन केली. मशीनने दोन कागद काढले - एक बोर्डिंग पास आणि एक बॅगेज टॅग. सुरक्षा तपासणीदरम्यान आणि नंतर बोर्डिंग गेटवरही कॅमेऱ्यांनी मला ओळखले. कोणत्याही संवादाची गरज नव्हती. मी माझ्या जागेवर पोहोचलो, नॉईज-कॅन्सलिंग हेडफोन लावले, गळ्यात -डु नॉट डिस्टर्ब’ची पाटी लटकवली आणि डोळे मिटून घेतले. माझे डोळे तेव्हाच उघडले, जेव्हा विमान उतरताना मला एक हलकासा धक्का बसला. घरातून बाहेर पडल्यानंतर मी जे पहिले वाक्य बोललो, ते एअरपोर्टच्या बाहेर माझ्या ऑफिसच्या ड्रायव्हरसोबत होते. आधुनिक प्रवासात तुमचे स्वागत आहे. हा प्रवास अत्यंत कार्यक्षम असतो. यात कुठेही कटकट नसते. हा प्रवास आश्चर्यकारकपणे सोयीस्कर आहे. पण याच नादात तो खूप एकटेपणानेही भरून गेला आहे. कदाचित आपल्याला 1960 च्या दशकातील प्रवासाचा थोडासा भाग आपल्या 2026 च्या आयुष्यात परत आणण्याची गरज आहे. नाही, आपल्याला कोळशावर चालणारी इंजिने परत आणण्याची गरज नाही, आणि धुराने भरलेले डबे व कडक बर्थही नकोत. पण त्या काळातील संवाद आपल्याला नक्कीच पुन्हा परत आणावे लागतील. ते अनोळखी लोक, जे हसून भेटायचे. ती मुले, जी फिरता फिरता दुसऱ्या एखाद्या बर्थवर जाऊन पोहोचायची. आणि ते काका, ज्यांनी आमचे नावही न जाणता आम्हाला हे शिकवले होते की चालत्या ट्रेनच्या खिडकीतून वस्तू बाहेर फेकणे ही वाईट सवय आहे. फंडा असा की - तंत्रज्ञानाने आपला प्रवास वेगवान केला आहे. पण आता कदाचित आपल्याला त्याला पुन्हा मानवी बनवण्याची गरज आहे. सगळीकडे ‘एकटे’ प्रवास करणे बंद करायला हवे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *