मुंबई: लोकलमध्ये विसरलेली १२ लाखांच्या दागिन्यांची बॅग तब्बल ३ वर्षांनी परत मिळाली! वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकामुळे सोन्याचे दागिने सुखरूप प्रवाशाला परत!

मुंबई: लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा प्रवाशांचे सामान किंवा मौल्यवान वस्तू विसरल्याच्या घटना घडतात आणि अशा हरवलेल्या वस्तू परत मिळणे जवळपास अशक्य मानले जाते. मात्र, मुंबईतून एका थक्क करणाऱ्या घटनेत, तब्बल तीन वर्षांपूर्वी लोकल ट्रेनमध्ये विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका प्रवाशाला सुरक्षितपणे परत मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आणि प्रयत्नांमुळे हा चमत्कार घडला असून प्रवाशाला त्यांचे १२ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जसेच्या तसे परत मिळाले आहेत.

नेमक काय घडलं होतं?
तल्हाह मोहम्मद झाकीर अन्सारी असे या प्रवाशाचे नाव असून ते २ नोव्हेंबर २०२३ रोजी अंबरनाथहून सीएसएमटी (CSMT) कडे लोकल ट्रेनने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुर्ला रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने असलेली आपली महत्त्वाची बॅग बाजूला ठेवली होती. ट्रेन जेव्हा भायखळा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर पोहोचली, तेव्हा अन्सारी घाईघाईत खाली उतरले, परंतु त्यांची सोन्याच्या दागिन्यांची बॅग लोकलच्या डब्यातच विसरली.

काही क्षणानंतर आपली बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब मागची लोकल पकडून थेट सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले. संबंधित लोकलमध्ये जाऊन त्यांनी बॅगेचा कसून शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही. अखेर हताश होऊन त्यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन आपल्या दागिन्यांची चोरी किंवा हरवल्याची अधिकृत तक्रार दाखल केली.

 

 

पोलिसांच्या तपासामुळे लागला सुगावा:
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) कसून तपासले. बऱ्याच तांत्रिक तपासाअंती पोलिसांच्या हाती एक भक्कम सुगावा लागला आणि त्यांनी या प्रकरणी अख्तर हुसैन मुस्तफा हुसैन शेख या संशयित आरोपीला शोधून काढून बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १२ लाख १५ हजार रुपये मूल्याचे संपूर्ण सोन्याचे दागिने सुरक्षितपणे जप्त केले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि पडताळणी पूर्ण करून पोलिसांनी जप्त केलेले हे सोने व मौल्यवान ऐवज तक्रारदार तल्हाह अन्सारी यांच्याकडे सुपूर्द केला. तब्बल तीन वर्षांनंतर आपले हरवलेले व अफाट मूल्याचे सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाल्यामुळे प्रवाशाने पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले असून मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *