डेंग्यूचा ताप उतरल्यानंतरचे ४८ तास सर्वाधिक धोकादायक; प्रकृती अचानक खालावण्याची शक्यता, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा इशारा"

डेंग्यूचा ताप उतरला म्हणजे धोका पूर्णपणे टळला, असा समज करून घेणे रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. उलटपक्षी, ताप उतरल्यानंतरचे पुढील ४८ तास डेंग्यू रुग्णांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे आणि धोकादायक असतात, असा महत्त्वपूर्ण इशारा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे. याच काळात रुग्andची प्रकृती अचानक खालावण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य वेळी आवश्यक तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाचे महत्त्वाचे सविस्तर मुद्दे व मार्गदर्शक सूचना:

  • केवळ प्लेटलेट्स नव्हे, एकूण प्रकृती महत्त्वाची: डेंग्यूच्या आजारात केवळ प्लेटलेट्सची संख्या पाहून रुग्णाची गुरुत्व किंवा गंभीरता ठरवता येत नाही. काही रुग्णांची प्लेटलेट्स कमी असूनही त्यांची प्रकृती स्थिर राहू शकते, तर काहींमध्ये प्लेटलेट्स तुलनेने जास्त असूनही गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब, रक्तस्रावाची लक्षणे, उलट्या, पोटदुखी, अशक्तपणा आणि इतर वैद्यकीय निकषांचा एकत्रित विचार करून उपचार करणे आवश्यक आहे.

  • उशिरा उपचार आणि इतर आजार: अनेक रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. काहींना यकृत, मूत्रपिंड, हृदय किंवा मेंदूशी संबंधित अन्य गंभीर आजारही असू शकतात. त्यामुळे डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणून प्रत्येक मृत्यूचे कारण डेंग्यूच आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

  • डेंग्यूची धोक्याची लक्षणे: तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, नाक किंवा हिरड्यांतून रक्तस्राव होणे, उलटी किंवा शौचातून रक्त जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिअशक्तपणा किंवा अस्वस्थता, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे, ही लक्षणे आढळल्यास विलंब न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही वेदनाशामक (Painkiller) औषधे घेऊ नयेत, कारण अशा औषधांमुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.

  • रुग्णालये आणि नागरिकांनी घ्यायची दक्षता: डेंग्यूचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याला मच्छरदाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून इतर डासांमार्फत संसर्गाचा प्रसार रोखता येईल. तसेच, घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे आणि डासांपासून संरक्षण करणारी साधने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *