छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महाग, अपहरण करून विवाहितेवर २४ तास अत्याचार;

छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर झालेली ओळख आणि मैत्री एका ३५ वर्षीय विवाहित महिलेसाठी अत्यंत धोकादायक ठरल्याची एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका नराधमाने विवाहितेचे अपहरण केले, तिला तब्बल २४ तास एका निर्जन ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार अमानुष अत्याचार केल्याची भीषण घटना घडली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील असून ते दोघेही ऊसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपी राजू मसू माळी याने या विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. महिलेने ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंग आणि संवाद सुरू झाला. दरम्यान, पीडिता आणि तिचा पती गंगापूर परिसरात ऊसतोडीसाठी गेले असताना आरोपी तिथेही पोहोचला, ज्यामुळे त्यांच्यातील संपर्क अधिक वाढला.

घाटी रुग्णालयातून केले अपहरण:
गेल्या काही दिवसांपूर्वी १४ जुलै रोजी ही पीडित महिला आपल्या मावसभावाला भेटण्यासाठी आपल्या बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात आली होती. दुपारी चारच्या सुमारास तिची बहीण घरी निघून गेल्यानंतर ती आपल्या भावासोबत रुग्णालयातच थांबली होती. हीच संधी साधून आरोपी राजू माळी तिथे पोहोचला. पीडिता पाणी आणण्यासाठी खाली गेली असता, आरोपीने तिला अडवले. "तुझे इन्स्टाग्रामवरील चॅट आणि खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या भयंकर धमक्यांमुळे प्रचंड घाबरलेली महिला नाइिलाजाने त्याच्या दुबलीवर बसली. मात्र, आरोपीने क्षणात तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून शहरापासून दूर एका निर्जन भागातील पत्र्याच्या शेडमध्ये नेले.

२४ तास ओलीस ठेवून अत्याचार:
त्या निर्जन ठिकाणी नेऊन नराधम राजू माळी याने त्या विवाहितेला तब्बल २४ तास ओलीस (बंधक) ठेवले आणि तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान पीडितेने हतबल होत मला माझ्या लहान मुलांची खूप आठवण येत आहे, मला कृपया घरी जाऊ द्या, अशी वारंवार हात जोडून विनवणी केली. मात्र, त्या विकृताच्या मनात जराही दया आली नाही. त्यानंतर १६ जुलै रोजी आरोपी तिला नेवासा परिसरातील आणखी एका दुसऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला आणि तिथेही दिवसभर डांबून ठेवत रात्री पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर १७ जुलै रोजी आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवून दिले. परंतु, जाताना "जर तू पोलिसांत तक्रार केलीस किंवा पुन्हा माझ्या नादी लागलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी खूनाची धमकीही त्याने दिली.

पतीला सांगितला संपूर्ण प्रकार आणि पोलिसांत धडक:
घरी पोहोचल्यानंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या आणि मानसिक धक्का बसलेल्या त्या विवाहितीने घडलेला सर्व भयंकर प्रकार आपल्या पतीला सविस्तर सांगितला. पतीने अत्यंत धाडस दाखवत व पत्नीला धीर देत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गाठून याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी वेगाने शोध घेत आरोपी राजू मसू माळी याला नेवासा येथून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *