वर्धा: 'आता मी कुणाशी खेळणार?' समृद्धीवरील अपघातात आई-वडिलांसह जुळ्या बहिणीला गमावलं; तन्वीच्या प्रश्नापुढे सारेच अबोल

वर्धा: समृद्धी महामार्गावर आयशर ट्रक एका चारचाकीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा करुण अंत झाला. कारमधील कुटुंब आपल्या लेकीला पुण्याला सोडून वर्धा येथे परतत असताना नियतीने काळा घाला घातला. या भीषण दुर्घटनेत आई-वडील आणि जुळ्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर घरात मागे राहिलेल्या चिमुकल्या तन्वीचे हृदय पिळवटून टाकणारे प्रश्न ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

काय घडली नेमकी घटना?
वर्धा जिल्ह्यातील सालोड (हिरापूर) येथील टिपले कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्याला सोडण्यासाठी गेले होते. मुलीला पुण्यात सुखरूप सोडल्यानंतर राजेश टिपले, त्यांची पत्नी सुषमा टिपले, मुलगी जान्हवी आणि चालक अंकुश राऊत हे कारने परत वर्ध्याकडे येत होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावर विरूळ लगत एक इथॅनॉल भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली होती आणि रांगेत गाड्या उभ्या होत्या.

 

याच वेळी मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. या अपघातात कारमधील चारही जण आणि ट्रकमधील दोघे मिळून एकूण सहा जण जळून जागीच मृत पावले.

तन्वीचा आर्त टाहो आणि हतबलता
एकाच कुटुंबातील तीन महत्त्वाच्या सदस्यांचा असा अचानक अंत झाल्यामुळे मागे उरलेल्या कुटुंबावर आणि लहान मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडील आणि सख्ख्या जुळ्या बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर चिमुकल्या तन्वीने केलेल्या प्रश्नांनी उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकले. "माझे आई-वडील आणि ताई कुठे गेले? आता मी कुणाशी खेळणार?" असा हंबरडा फोडत तिने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे कोणाजवळही नव्हते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सालोड गावात आणि वर्धा जिल्ह्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *