धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!

धाराशिव: जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर २०२६) दुपारी एक अत्यंत मन हेलावणारी आणि हादरवून टाकणारी दुर्घटना घडली. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू असलेल्या एका ३० वर्षीय मातेने आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यातील सर्वांत उंच असलेल्या 'उपली बुरुजावरून' सुमारे १५० फूट खोल दरीत उडी मारून टोकाचे पाऊल उचलले. या भीषण दुर्घटनेत माता अश्विनी मनोहर पौळ (वय ३०, रा. अंबुलगा, ता. निलंगा, जि. लातूर) आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य मनोहर पौळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्या अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरी जुळी मुलगी वीरा हिची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अश्विनी मनोहर पौळ या गुरुवारी आपल्या तीन लहान मुलांसह (अजिंक्य, वीरा आणि क्रांती) नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आल्या होत्या. दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास त्या किल्ल्यातील सर्वांत उंच असणाऱ्या उपली बुरुजावर गेल्या. या बुरुजाची उंची सुमारे १५० फूट इतकी आहे. तेथील एका छोट्या कमानीतून अश्विनी यांनी आपल्या तिन्ही मुलांना सोबत घेऊन थेट खाली दरीत उडी मारली. या भीषण कोसळण्यामुळे अश्विनी आणि मुलगा अजिंक्य यांचा जागीच प्राण गेला, तर दोन्ही जुळ्या मुली गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच किल्ल्याचे इन्चार्ज नागनाथ गवळी यांनी तात्काळ नळदुर्ग पोलिसांना याबाबत कळविले.

माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अख्तर सय्यद आणि बीट अंमलदार खलील शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या वीरा आणि क्रांती या दोन्ही जुळ्या मुलींना तात्काळ नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे उपचारादरम्यान एका चिमुरडीचाही मृत्यू झाला.

गेटवर केक कापला आणि घडली दुर्दैवी घटना

या घटनेबाबत एक अत्यंत भावूक माहिती समोर आली आहे. नळदुर्ग किल्ल्यावर येताना अश्विनी यांनी एक केक आणला होता. किल्ल्यावर जाऊन तो केक कापायचा असे त्यांचे नियोजन होते. मात्र, सुरक्षारक्षकाने किल्ल्याच्या आत केक घेऊन जाण्यास नकार दिल्याने, अश्विनी यांनी गडाच्या दरवाज्याजवळच तो केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी हे अत्यंत भयानक आणि टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पतीच्या सांगण्यावरून सोडली होती नोकरी

मृत अश्विनी पौळ या मूळच्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील असून त्यांचे माहेर उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथील आहे, त्यांचे वडील शिक्षक आहेत. अश्विनी या मुंबई येथे 'महाराष्ट्र सुरक्षा बल' (MSF) मध्ये नोकरीला होत्या. त्यांचे पती मनोहर पौळ हे रिक्षाचालक आहेत. पती मनोहर यांच्या सांगण्यावरूनच अश्विनी यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी आपली मुंबईतील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या.

कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप

या संपूर्ण प्रकरणामागील नेमके कारण अजून अधिकृतपणे समोर आले नसले, तरी पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला तसेच कौटुंबिक छळाला कंटाळूनच अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या मंडळींनी व वडिलांनी केला आहे. नळदुर्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून सर्व बाजूंनी कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे नळदुर्ग किल्ल्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संपूर्ण परिसरात व क्रीडा जगतात मोठी शोककळा पसरली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *