यवतमाळ: मोबाईलवरून मदतीची आर्त हाक, पण कार नदीत बुडाल्याने काळाने तिघांवर साधला घाला

यवतमाळ: आमची कार नदीत पडली, आम्हाला वाचवा, अशी आर्त हाक मोबाइलवरून दिली. लोकांपर्यंत निरोप पोहोचला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. यात आईसह दोन मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर मुलीच्या वडिलांना झाडाचा आधार मिळाल्याने चार तासांच्या प्रयत्नानंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी येथे घडली.

मृतांमध्ये माधवी अविनाश खंदारे (वय ४०), प्राची अविनाश खंदारे (१७) व साची अविनाश खंदारे (१२, रा. लोणी ता. आर्णी) यांचा समावेश आहे. लोणी येथील अविनाश खंदारे हे कुटुंबासह राळेगाव येथे कार्यक्रमासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात बोरी अरब येथे नातेवाइकांना सोडल्यानंतर ते दारव्हा मार्गे लोणीकडे येत असताना दहेली येथील कुपटी नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. त्याचवेळी त्यांची कार प्रवाहात अडकून काही क्षणांतच वाहून गेली.

कारमध्ये पाणी शिरू लागल्याने अविनाश व माधवी खंदारे यांनी नातेवाईक आणि गावकऱ्यांना मोबाइलवरून मदतीची हाक दिली. माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. दरम्यान, झाडावरून मदतीसाठी आवाज येत असल्याची माहिती पुलाजवळ उभ्या असलेल्या एसटी बसचालकांकडून मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. पुराच्या प्रवाहात अविनाश खंदारे यांनी प्रसंगावधान राखत झाडावर चढून जीव वाचवला. पहाटे सुमारे चार वाजता बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढून दारव्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, कार व बेपत्ता तिघांचा शोध सुरू होता. शुक्रवारी दुपारी १२ वाजता पुलापासून सुमारे २०० मीटर अंतरावर कार अडकून असल्याचे दिसले. गावकरी व बचाव पथकाने संयुक्तरीत्या कारमधून माधवी, प्राची व साची यांचे मृतदेह बाहेर काढले. माधवी खंदारे या तासिका तत्त्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. अविनाश खंदारे यांचा हॉटेल आणि कार किरायाने देण्याचा व्यवसाय आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने लोणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *