मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!

मुंबई: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या, नादुरुस्त तसेच स्क्रॅप झालेल्या रिक्षांविरोधात राज्य सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. नियमबाह्य पद्धतीने आणि विनापरवाना रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर धोका ठरत आहेत. अशा अनधिकृत रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत, अशा स्पष्ट शब्दांत तडाखेबंद निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी सुनावले आहेत.

राज्यात स्क्रॅप घोषित झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा अद्यापही अवैध प्रवासी वाहतुकीसाठी सर्रास वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच राज्यभरातील विविध रिक्षा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवाशांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता

बैठकीत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य, विनापरवाना आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली जाणार नाही. ज्या रिक्षांचा वापर पूर्णपणे थांबवणे आवश्यक आहे किंवा ज्या स्क्रॅप घोषित करण्यात आल्या आहेत, अशा रिक्षांचा पुन्हा गैरवापर करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी करणे किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांची ने-आण करणे यावर कडक नजर ठेवण्यात यावी. अशा सर्व संशयित वाहनांची विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

संबंधित नियमबाह्य वाहनांवर नियमानुसार तातडीने दंडात्मक कारवाई करण्यासोबतच जप्तीची कठोर पावले उचलावीत, असे आदेशही त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (RTO) आपापल्या कार्यक्षेत्रात ही विशेष तपासणी मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवावी आणि येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा सविस्तर अहवाल व आढावा सादर करावा, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

या बैठकीदरम्यान रिक्षा-टॅक्सी चालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अनधिकृत आणि नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची आणि प्रामाणिक चालकांची प्रतिमा खराब होत असल्याचे सांगत, केवळ अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळावी, अशी भूमिका यावेळी सर्वानुमते मांडण्यात आली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *