मुंबई: आता सरकारी रुग्णालयांनाही मिळणार 'स्टार रेटिंग' ग्रामीण ते जिल्हा स्तरावरील ६२३ रुग्णालयांचे सेवेच्या गुणवत्तेवर होणार मूल्यांकन

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सरकारी रुग्णालयांच्या सेवेचा दर्जा अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत 'स्टार रेटिंग प्रणाली' लागू केली आहे. या नव्या व्यवस्थेनुसार आता ग्रामीण ते जिल्हा स्तरावरील सरकारी रुग्णालयांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर ० ते ५ स्टार सार्वजनिक गुणवत्ता मानांकन दिले जाणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या संदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी अधिकृतपणे जारी केला आहे.

या नवीन प्रणालीअंतर्गत रुग्णालयांचे मूल्यांकन एकूण दहा प्रमुख निकषांवर केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सेवेची उपलब्धता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती, आवश्यक औषधांचाक साठा, विविध निदान चाचण्यांची सुविधा, ओपीडी व बेड ऑक्युपन्सी (रुग्णसंख्या व खाटांची उपलब्धता), प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, रुग्णालया परिसरातील स्वच्छता आणि रुग्णांकडून मिळणारा अभिप्राय (फीडबॅक) यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. प्रत्येक निकषासाठी अर्धा स्टार देण्यात येणार असून, सर्व निकष उत्कृष्टपणे पूर्ण करणाऱ्या रुग्णालयाला थेट पाच स्टार मानांकन मिळणार आहे.

मूल्यांकन आणि सत्कार:
रुग्णालयांच्या कामकाजाचा सर्वसमावेशक डेटाबेसच्या आधारे दरवर्षी जानेवारी आणि ऑगस्ट अशा वर्षातून दोन वेळा हे मूल्यांकन केले जाईल. यामध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक स्टार मिळविणाऱ्या उत्कृष्ट रुग्णालयांना राज्य सरकारतर्फे विशेष गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संपूर्ण व्यवस्थेमध्ये ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य व स्त्री रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, तसेच राज्य कामगार विमा रुग्णालये अशा एकूण ६२३ सरकारी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

रुग्णांसाठी काय बदलणार?
राज्य सरकारच्या मते, या स्टार रेटिंग प्रणालीमुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये एक सकारात्मक स्पर्धात्मकता वाढीस लागेल, सेवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी जाताना रुग्णालयांच्या कामगिरीची पारदर्शक माहिती सहज उपलब्ध होईल. यामुळे कमी गुण मिळालेल्या रुग्णालयांवर सेवा सुधारण्याचा मोठा दबाव निर्माण होईल, तर चांगली कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांबद्दल लोकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल.

मनुष्यबळाची कमतरता हीच खरी अडचण:
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते कोणतीही रेटिंग प्रणाली यशस्वी आणि प्रभावी ठरण्यासाठी त्याचे मूल्यांकन निष्पक्ष, पारदर्शक व नियमित होणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ गुणांकन देऊन चालणार नाही, तर ग्रामीण भागातील रुग्णालयांच्या उणिवा दूर करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, औषधांचा सुरळीत पुरवठा, आधुनिक उपकरणांची उपलब्धता आणि योग्य आर्थिक पाठबळ मिळाल्यासच या उपक्रमाचे अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून येतील. सध्या राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत जर मनुष्यबळच अपुरे असेल, तर संबंधित रुग्णालयांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊन ती रुग्णालये रेटींगमध्ये कायम मागे पडण्याची भीतीही वर्तवली जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *