Mumbai Crime : वडाळ्यात होळीला गालबोट; धुळवडीच्या जल्लोषात बिअरवरून दोन गटांत हाणामारी, तरुणाचा मृत्यू

Mumbai : मुंबईत मंगळवारी सगळीकडे धुळवडीचा जल्लोष सुरू असताना वडाळ्यात मात्र उत्साहाला गालबोट लागले. बियरची बाटली पडून फुटल्याने झालेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत 20 वर्षीय तुषार उज्जैनवाला याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी अशी घटना घडल्याने परिसरात दु:ख व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अतिशय क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडली आहे. अशाप्रकारे राडा करणाऱ्यांना पोलिसांचं भय नाही का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात कार्यक्रमासाठी बांधलेल्या एका स्टेजच्या बाजूला चारजण बियर पित बसले होते. सायंकाळी चारच्या सुमारास तुषारचा भाऊ आणि त्याचा मित्र येथून चालले होते. तुषारच्या भावाचा पाय एका बियरच्या बाटलीला लागला आणि बाटली खाली पडून फुटली. यामुळे संतापलेल्या चौघांनी तुषारच्या भावासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की करतानाच त्यांनी बियरची मागणी केली. चौघे ऐकत नसल्याचे पाहून या तरूणाने घर गाठले आणि सर्व हकिकत तुषारला सांगितली.

दोन गटात वाद आणि हाणामारी
चौघांना जाब विचारण्यासाठी तुषार हा आणखी तिघांसह त्या ठिकाणी आला. यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. यानंतर तुषारसोबत असलेले तिघे बाजूला गेल्यानंतर पुन्हा वाद झाला. तुषार एकटाच असल्याचे पाहून चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तुषार बेशुद्ध पडल्याने येथील नागरिकांनी त्याला सायन रुग्णालयात नेले. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेतल तुषारला मारहाण करणाऱ्या चार तरूणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *