माउलींच्या रथाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; आषाढी वारीसाठी १ टन वजनाचा हलका 'चांदीचा रथ' सज्ज!

आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी यंदा एक नवा, वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला चांदीचा रथ भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. आळंदीजवळील चिंबळी येथे हा रथ आकाराला आला असून, तो परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा ठरला आहे.

 

या रथाची प्रमुख वैशिष्ट्ये: १. वजन कमी, सुविधा जास्त: जुना चांदीचा रथ अडीच टन वजनाचा होता, ज्यामुळे बैल ओढताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागायचा. नवीन रथाचे वजन १ टनाने कमी करून ते दीड टनावर आणले आहे. यामुळे रथाची ओढ सुलभ झाली आहे.

२. आधुनिक तंत्रज्ञान: डीआरडीओच्या (DRDO) मार्गदर्शनाखाली आणि अष्टेकर ज्वेलर्सच्या सहकार्याने हा रथ तयार केला आहे. यामध्ये अत्याधुनिक बेअरिंग-कपलिंगचा वापर केल्याने रथाची हालचाल अधिक सहज आणि सुरळीत झाली आहे.

३. सुरक्षा आणि कलाकुसर: सुरक्षेच्या दृष्टीने या रथावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. रथाचे वरचे स्ट्रक्चर फायबरचे असून त्यावर चांदीचे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यात आले आहे, ज्यामुळे रथाला आकर्षक चकाकी मिळाली आहे.

४. धार्मिक प्रतीक: रथाच्या अग्रभागी माउलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान आणि जय-विजय यांच्या सुंदर प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत, जे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

५. खर्च आणि वापर: सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्चून तयार केलेला हा रथ भाविक स्वतः, बैल किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहज ओढू शकतील. ८ जुलै रोजी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी हा रथ माउलींच्या सेवेत दाखल होणार आहे.

 

देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या माहितीनुसार, वारीपूर्वी या रथाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येणार असून, यामुळे पालखी सोहळा अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.



गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *