नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! कॉर्पोरेट नोकरीतील अस्थिरता आणि महागाईला कंटाळून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तब्बल २ लाख ४९ हजार तरुण व नागरिक वळले उद्योजकतेकडे!

सध्याच्या धकाधकीच्या युगात खासगी नोकरीतील वाढती अस्थिरता, वेळेचे बंधन, तुटपुंजे वेतन आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी प्रचंड महागाई या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील तरुणांचा तसेच नागरिकांचा कल आता पारंपरिक नोकऱ्या सोडnा व स्वतःचा छोटा-मोता उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकडे वेगाने वाढू लागला आहे. ‘दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उत्तम’ हा विचार आता प्रत्यक्षात उतरताना दिसत असून, गेल्या एका वर्षाच्या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात तब्बल २ लाख ४९ हजार ८१७ नवीन दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांची अधिकृत नोंदणी झाली आहे. ही वाढती आकडेवारी शहरात उद्योजकतेची एक नवी लाट आल्याचे स्पष्टपणे दर्शवत आहे.

विशेषतः तरुण वर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे नोकरदार वर्ग आता मानसिक ताणतणाव आणि नोकरीतील अनिश्चिततेमुळे कंटाळले आहेत. महिन्याकाठी मिळणाऱ्या मर्यादित पगारातून कुटुंबाचा खर्च भागवणे आणि भविष्याची आर्थिक सुरक्षा निर्माण करणे कठीण होत चालल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा स्वयंरोजगार आणि व्यवसायाकडे वळवला आहे. आयटी सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, आणि खाजगी कंपन्यांमध्ये सतत होणारी कपात (Layoffs) आणि जॉब सिक्युरिटीचा अभाव यामुळे तरुणांनी स्वतःचे स्टार्टअप्स, रिटेल दुकाने, फ्रँचायझी, क्लाउड किचन, ई-कॉमर्स व्यवसाय तसेच सेवा क्षेत्रातील लहान व्यवसाय सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. सरकारी स्तरावर आणि विविध योजनांच्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहन देखील या बदलाला मोठे बळ देत आहे.

स्थानिक उद्योग व व्यापार वर्तुळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत झालेल्या नवीन आस्थापनांमध्ये किराणा दुकाने, फॅशन बुटीक, रेस्टॉरंट्स, कॅफे, डिजिटल सेवा केंद्रे, इलेक्ट्रॉनिक दुकाने तसेच सेवा पुरवणाऱ्या विविध स्टार्टअप कंपन्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. विशेष म्हणजे केवळ पुरुषच नव्हे, तर महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने गृहउद्योगापासून ते व्यावसायिक दुकानांच्या माध्यमातून या उद्योजकतेच्या प्रवाहात सामील होत आहेत. हे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरांच्या आर्थिक अर्थकारणाला एक नवीन आणि बळकट दिशा देणारे ठरत आहे.

या वाढत्या बदलामुळे शहरात नोकरी शोधणाऱ्यांची संख्या काहीशी कमी होत असली, तरी नवीन उद्योगांमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर या नवउद्योजकांना योग्य वेळी बँक कर्ज, सुलभ शासकीय परवानग्या आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचे पाठबळ मिळाले, तर हे लघुउद्योग भविष्यात मोठ्या कंपन्यांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. यामुळे केवळ वैयक्तिक आर्थिक प्रगतीच नाही, तर देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही एक नवी गती मिळण्यास मदत होईल.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *