अमरावतीत खळबळ! दोन वर्षे ओळख अन् अचानक फोन उचलणं बंद केल्याच्या रागातून तरुणाने केली अल्पवयीन मुलीची हत्या; गोंदियातून आरोपी जेरबंद

अमरावती शहरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या रवीनगर चौकात एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीने हत्येनंतर कुटुंबीयांना फोन करून आपण मुलीवर चाकूने वार केल्याची माहिती स्वतः दिल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी वेगाने सूत्रे हलवत आरोपीला गोंदिया रेल्वेस्थानकावरून शिताफीने ताब्यात घेतले आणि अमरावतीत आणले.

नेमकी घटना कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएस्सी प्रथम वर्षाला शिकणारी अल्पवयीन विद्यार्थուी गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास आपली दुचाकी घेऊन महाविद्यालयात जात होती. रवीनगर परिसरातील एका नाल्याजवळ येताच आरोपी आनंद नंदकिशोर भड (वय २२, रा. पोही, ता. मूर्तिजापूर) याने तिला अडवले. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या वादानंतर आरोपीने सोबत आणलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने मुलीवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

हत्येमागचे कारण आणि पोलिसांची कारवाई: पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी आनंद भड आणि मृत अल्पवयीन मुलगी यांची मागील दोन वर्षांपासून ओळख होती. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून त्या मुलीने आनंदचे फोन उचलणे आणि त्याच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. आपण संपर्क साधत असतानाही ती प्रतिसाद देत नसल्‍याच्या रागातून आरोपीच्या मनात तिच्याविषयी तीव्र संताप निर्माण झाला होता. याच रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली संशयिताने दिली आहे.

गीतांजली एक्स्प्रेसने केला पसार होण्याचा प्रयत्न: अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर संशयित आनंद भड याने रक्ताच्या थारोळ्यात तिला सोडले आणि तब्बल तासभर आपली दुचाकी घेऊन शहरात विविध भागात फिरत राहिला. त्यानंतर त्याने आपली दुचाकी बडनेरा रेल्वेस्थानक परिसरात लावली आणि दुपारी सुटका करून घेण्यासाठी थेट गीतांजली एक्सप्रेस ट्रेन पकडली. तो नागपूर मार्गे गोंदियाच्या दिशेने पसार झाला. राजापेठ पोलिसांचे एक पथक सुरुवातीला त्याच्या शोधासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील पोही गावात गेले होते, परंतु तो तिथे सापडला नाही. दरम्यान, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचे मोबाइल लोकेशन ट्रॅक केले असता तो गोंदियात असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ पावले उचलत राजापेठ पोलिसांचे पथक गोंदिया रेल्वेस्थानकावर धडकले आणि गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याला शिताफीने बेड्या ठोकल्या. उशिरा रात्री त्याला अमरावतीत आणण्यात आले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *