बलराज संघई यांचा कॉलम:सुविधा नव्हे, सुख महत्त्वाचे; जागृत चेतनाच खरे शाश्वत सत्य

भौतिक सुख आणि सुविधा म्हणजे आपल्या सांसारिक जीवनाला अधिक आरामदायक, सोयीस्कर आणि सुलभ बनवणारे भौतिक घटक, जसे की निवास, बंगला, गाडी, पंखा, फ्रीज, उत्तम अन्न आणि कपडे. या सामान्य आवश्यकतेच्या वस्तू आहेत. परंतु त्या अधिक किमतीच्या आणि त्यात अधिक सोय असलेल्या असा हट्ट पुर्वक मानसिक आग्रह असणे यामुळे मानसिक शांतता भंग होते आणि वास्तविक आनंद मिळत नाही. या गोष्टी तात्पुरता शारीरिक आराम आणि आनंद देतात, परंतु त्या शाश्वत किंवा कायमस्वरूपी आंतरिक आनंदाची हमी देऊ शकत नाहीत. म्हणूनच कुठेतरी अंतरिक आनंदाची आवश्यकता भासते आणि त्यावर विचार करणे गरजेचे ठरते. खरा आणि अधिक वेळ टिकणारा आनंद संतोष वृत्तीतून येत असतो. जे काही उपलब्ध आहे त्यात सुख आणि समाधान मानणे हिताचे ठरते. आपली कुवत नसलेल्या किमतीच्या वस्तू मिळवण्यासाठी माणूस अन्य प्रकारे प्रयत्न करत असतो. यातूनच अनैतिकतेचा जन्म होतो. भौतिकतेवर आधारित जीवनशैलीचा अधिक अवलंब आणि त्या सुविधांचा संग्रह यातूनच निर्दयता, अनैतिकता, स्वार्थ, अशा वृत्ती जन्माला येतात. वर्तमान काळानुसार शारीरिक गरजा पूर्ण करणे जसे की अन्न, निवारा आणि आरामदायी जीवनमान त्यात मोबाइल, गाडी, ए.सी., फ्रिज, उत्तम घर इत्यादींचा समावेश होतो. परंतु यापासून मिळणारी, अशा प्रकारची भौतिक सुखं मर्यादित काळासाठी आनंद देतात; एकदा या भौतिक वस्तूंच्या वापराची अती सवय झाली की त्यातील आनंद दिवसेंदिवस कमी होतो. म्हणूनच माणूस भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी अन्य प्रकारे वस्तूंच्या प्राप्तीच्या शोधात अनैतिक, वाम का मग मार्गाचा अवलंब करत असतो. 'सुविधा' याचा अर्थ म्हणजे साधन (उदा. पंखा), तर 'सुख' म्हणजे त्या साधनामुळे मिळणारा मानसिक आनंद किंवा समाधान. भौतिक सुविधा गरजेच्या आहेत, परंतु त्या एका मर्यादेपर्यंत असाव्यात. वास्तविक पाहता सुखी आयुष्यासाठी मानवी मूल्ये जसे की विश्वास, आदर, प्रेम करुणा, दया संतोष वृत्ती हे जसे महत्वाचे तसेच त्यासाठी आत्मिक साधना , विवेक पूर्णता आणि आध्यात्मिक विचाराची जाणीव असणे तितकेच महत्त्वाचे आहे. थोडक्यात, भौतिक सुविधा (Physical Facilities) आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु मानसिक समाधान हे विचार आणि अंतर्गत समतोलावर अवलंबून असते. धन, वैभव भौतिक सुविधा देते. सुविधा आणि सुख यामध्ये मोठा फरक आहे. सुविधा, सोय, पूर्तता या बाह्य व्यवस्था आहेत. सुख आणि शांती अंतरीक अवस्था आहेत. कोणी सर्व व्यवस्था असून बेचैन असू शकतो तर कोणी अत्यंतिक उणिवा असूनही सुखी असतो. आहे त्या परिस्थितीत सुख आणि शांतीत राहण्याची मानसिक तयारी, सवय असावी. प्रश्न वैभवाचा नाही तर आंतरिक चेतनेचा आहे. मनाची गुलामी सोडावी. वर्तमानात चेतना जागृत असावी. उद्या वैभव, प्रेम मिळेल त्या वेळी जगू हा विचार निरर्थक आहे. वर्तमान क्षण शाश्वत सत्य आहे, केवळ तो क्षण भूतकाळातील स्मृती आणि भविष्याच्या कल्पना सोडून जगावा. अर्थात चेतना जागृत असणे. तेंव्हाच आपण आपले मालक असतो. सुख शांतित असतो. म्हणूनच वर्तमानातील क्षण हा भौतिकते च्या अधिक आहारी न जाता, विवेक पूर्णतेत, संतोष वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करत असतानाच वास्तविक आत्मिक समाधान आणि सुख लाभेल. शरीर आहे आणि आयुष्य आहे म्हणून जगणे क्रमप्राप्त ठरते, परंतु या जगण्यासाठी भौतिकतेचा किती प्रमाणात अवलंब करायचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक पूर्ण अध्यात्मिक चेतना जागृत असेल तर त्याचा परिणाम जीवनशैलीवर नक्कीच असणार यात शंका नाही. त्यातूनच वास्तविक समाधान शांती लाभेल. (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *