एन. रघुरामन यांचा कॉलम:नफ्यासाठी समस्या येण्यापूर्वीच ओळखा, त्यावर उपाय विकसित करा

जेव्हा इतर कंपन्या आपले बजेट गोठवत असतात आणि एखादी कंपनी वेगाने नोकरभरती करू लागते, तेव्हा साहजिकच तुमचे लक्ष त्याकडे वेधले जाते. म्हणूनच, जेव्हा मी ऐकले की थायलंडमध्ये मुख्यालय असलेले ॲग्री-टेक स्टार्टअप ‘लिव्हिंग रूट्स’, जे अभी अग्रवाल आणि अविका नरुला यांनी सुरू केले आहे, ते अतिरिक्त लोकांची भरती करत आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले की असे का? कुतूहलापोटी केलेल्या शोधात जगभरातील अशा कंपन्यांचा शोध लागला, ज्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ओळखल्या आहेत आणि त्यावर उपाय तयार करत आहेत. लिव्हिंग रूट्स त्यापैकीच एक आहे. ही कंपनी स्थानिक कचरा, सहजीवी मायक्रोब्स आणि एआयआधारित डेटाच्या माध्यमातून रासायनिक खतांना सेंद्रिय पर्याय तयार करते, जेणेकरून मातीचे आरोग्य सुधारेल आणि पारंपरिक रसायनांवरील अवलंबित्व कमी होईल. जगात ग्राहक वस्तूंच्या पुरवठ्याची जीवनरेखा असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीला बाधित करणारे भू-राजकीय तणाव निवळताना दिसत नाहीत. अशा स्थितीत खतांची समस्या दीर्घकाळ टिकू शकते. संघर्ष लांबला तर जगात पिकांचे उत्पादन घटू शकते आणि किराणा महाग होऊ शकतो. अतिरिक्त 4.5 कोटी लोकांना गंभीर अन्न असुरक्षिततेला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा यूएनच्या अन्न आणि कृषी संघटनेने दिला आहे. शेतकरी अनेक महिने, किंबहुना वर्षभरापूर्वीच नियोजन करत असल्यामुळे, अनेक शेतकरी आता 2027 च्या उत्पादनाचा अंदाज लावू लागले आहेत. दुसरीकडे, जागतिक बँकेचा अंदाज आहे की या वर्षी खतांच्या किमती एक तृतीयांशने वाढू शकतात. याची खरेदी क्षमता 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतरच्या सर्वात वाईट पातळीवर पोहोचू शकते. परिणामी, शेतकरी प्रचंड दबावाखाली आहेत. विशेषतः यामुळे, कारण मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन खत युरियाचा मोठा हिस्सा आखाती देशांतूनच येतो. कृषी व्यवसाय याचा फटका सहन करत आहेत. काही लोक शेणखतासारख्या जुन्या पद्धतींकडे परतत आहेत, तर काही रसायनांवरील अवलंबित्व कमी करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यामध्ये बदामाच्या टरफलांपासून बनवलेल्या इनपुटपासून ते प्रगत मायक्रोबियल उत्पादनांचा समावेश आहे. असेच काम करणारी कॅलिफोर्नियाची ‘नायट्रिसिटी’ आपली क्षमता वाढवत आहे आणि तिचे अंदाजित उत्पादन 2028 पर्यंत बुक झाले आहे. मलेशियातील दुग्ध उत्पादक ‘फार्म फ्रेश’ गुरांचा कचरा कृमींना खाऊ घालते. बदल्यात ते कृमी ते गवत सुपीक बनवतात, जे त्यांच्या गाई खातात. ही कंपनी पूर्वीही असे करत असली, तरी या वर्षी युरियाच्या किमती वाढल्याने ती यावर अधिक अवलंबून राहिली. कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की, ते त्यांच्या जमिनीवर कोंबड्यांची विष्ठा टाकतात. खरे तर, परदेशात पीक वाढीचे मार्ग शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पोल्ट्री खत हे सर्वाधिक मागणी असलेले उत्पादन बनले आहे. लिव्हिंग रूट्सचा दावा आहे की त्यांचे ‘फोटोबूस्ट’ नावाचे उत्पादन रासायनिक खतांचा वापर 50 टक्क्यांपर्यंत आणि खर्च 20 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची विष्ठा वाहून नेणारे ट्रान्सपोर्टरही चांगली कमाई करत आहेत. शिवाय, फ्रान्सचे स्टार्टअप ‘टूपी ऑरगॅनिक्स’ आहे, जे शाळांमधून मानवी मूत्र गोळा करून त्याचे अशा बॅक्टेरियल फीडमध्ये रूपांतर करते, जे वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त ठरते. वाचायला जरी हे विचित्र वाटत असले, तरी सध्या खऱ्या जगात हेच उपाय अमलात येत आहेत. जेव्हा जागतिक कृषी समुदाय या टंचाईवर मात करण्यासाठी व्यावहारिक पर्यायांच्या प्रतीक्षेत आहे, तेव्हा बाजारात एक पोकळीही निर्माण झाली आहे. व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या सुशिक्षित उद्योजकांसाठी हीच संधी आहे की त्यांनी शेतीच्या या समस्यांवर उपाय शोधून परिस्थिती आपल्या बाजूने वळवावी. पण हे तितके सोपे नाही. या उपायांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करणे हे अजूनही मोठे आव्हान आहे, कारण अनेक दशकांपासून पारंपरिक खतांवर अवलंबून असलेले शेतकरी अनोळखी उत्पादनांवर विश्वास ठेवण्यास सहसा तयार नसतात. काही जैविक उपाय स्थिरतेच्या समस्येशीही झुंजत आहेत. उदाहरणार्थ, मुसळधार पावसात मायक्रोब्स वाहून जातात. पण यामुळे पर्याय तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये खंड पडता कामा नये. फंडा हा आहे की, जर तुम्ही भविष्यातील समस्या आधीच ओळखली आणि वेळेवर उपाय तयार केला, तर नफा आपोआप तुमच्या मागे येईल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *