पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर

पुणे: अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणेकरांची वर्षभराची पाण्याची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली असून, संपूर्ण धरणसाखळी जवळपास ९६ टक्क्यांहून अधिक भरली आहे. यामुळे पुणे शहर आणि परिसराचा आगामी काळातील पाणीपुरवठा सुरक्षित झाला असून नागरिकानी मोठा सुटकेचा श्वास सोडला आहे.

प्राप्त माहितीनुसार, खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक प्रचंड वेगाने होत आहे. खडकवासला धरण १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरले असून, इतर तीन धरणे देखील होण्याच्या मार्गावर आहेत. चारही धरणांमध्ये मिळून एकूण जवळपास २८.११ टीएमसी (सुमारे ९६.४३ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा जमा झाल्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला आहे.


धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे धरणांची सुरक्षा लक्षात घेता जलसंपदा विभागाने खडकवासला तसेच इतर धरणांच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाण्याची आवक आणि पातळी पाहून विसर्गात सातत्याने वाढ करण्यात येत असून नदीकाठच्या परिसरामध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा (Flood Alert) देण्यात आला आहे.


प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच नदीकाठचे पंप, शेतीचे साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हालवण्यास सांगण्यात आले आहे. जूनच्या सुरुवातीला पाण्याची चिंता करणाऱ्या पुणेकरांना या दमदार पावसामुळे आणि धरण भरल्याच्या वृत्तामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *