मुंबई: जीव जाताहेत तरी उद्यान विभागात ३६ पदे रिक्तच; धोकादायक झाडांची जबाबदारी घेणार कोण?

मुंबई: मान्सूनमध्ये झाडे कोसळून मृत्यूच्या घटना घडत असतानाही बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातील ३६ पदे अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे धोकादायक झाडांची तपासणी, फांद्यांची छाटणी आणि असुरक्षित झाडे हटविण्याच्या कामांवर मोठा परिणाम होत आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर मनपाच्या बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची मागणी केली आहे.

२२ जून ते १७ जुलै या कालावधीत मुंबईतील सार्वजनिक तसेच खासगी जागांवर ९०२ झाडे उन्मळून पडली, तर १,२५१ फांद्या कोसळल्या. या दुर्दैवी दुर्घटनांमध्ये तिघांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, धोकादायक झाडांची ओळख पटवणे, फांद्यांची छाटणी करणे व असुरक्षित झाडे हटविण्याची मुख्य जबाबदारी असलेला उद्यान विभाग सध्या तीव्र मनुष्यबळ कमतरतेमुळे अडचणीत सापडला आहे.

हेतल गाला यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, उद्यान सहाय्यक व कनिष्ठ वृक्ष अधिकारी यांच्या मंजूर १०६ पदांपैकी तब्बल ३६ पदे रिक्त आहेत. परिणामी, उद्याने व विरंगुळा मैदानांची देखभाल, मान्सूनपूर्व फांद्यांची छाटणी, झाडांच्या आरोग्याची तपासणी तसेच इतर संबंधित उद्यानविषयक कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांतील प्रमुख दुर्घटना:
३० जून: चेंबूरमध्ये रस्त्यालगतचे झाड उन्मळून शाळेच्या बसवर कोसळल्याने ११ वर्षीय विहान श्रीवास्तव याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

५ जुलै: आरे वसाहतीत मोटारसायकलवर झाडाची फांदी पडल्याने १८ वर्षीय हसन रझा जहांगीर आलम सय्यद या तरुणाला प्राण गमवावे लागले.

६ जुलै: कुर्ला पश्चिम येथे दुकानावर झाड कोसळल्याने ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला.

कामात अडथळे येत असल्याची कबुली:
पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महत्त्वाची वृक्ष व्यवस्थापनाची कामे वेळेत पूर्ण करणे कठीण होत असल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, २२ जून ते १७ जुलैदरम्यान मनपाने सार्वजनिक आणि खासगी जागांवरील ३,८४१ धोकादायक झाडे व फांद्या हटवल्या असून, सध्या ५४२ ठिकाणी ही कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, नागरिकांना एखादी झाड किंवा फांदी धोकादायक स्थितीत आढळल्यास त्याची माहिती त्वरित '१९१६' या मदत क्रमांकावर देण्याचे आवाहन पालिकेकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *