मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार

मुंबई: आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेने दादर-पंढरपूर-दादर विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष रेल्वेच्या प्रत्येकी एका फेरीसह एकूण दोन फेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, मुंबई आणि पुण्यासह उपनगरातील वारकऱ्यांना थेट पंढरपूर गाठणे सोपे होणार आहे. या विशेष रेल्वेचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी झाल्यास आणखी विशेष गाड्या चालविण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वेळापत्रक आणि मार्ग
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०४५ ही विशेष रेल्वे गाडी २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५० वाजता दादर येथून सुटून त्याच दिवशी रात्री ९.१५ वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी, ट्रेन क्रमांक ०१०४६ ही विशेष रेल्वे २६ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता दादरला पोहोचेल.

महत्त्वाचे थांबे आणि रचना
या विशेष रेल्वेला प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डूवाडी येथे थांबे देण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान (स्लीपर), चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह एकूण १८ डबे असणार आहेत. वारकऱ्यांनी या विशेष सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *