Pune : पुणेकरांनो, यंदाचे गणेश विसर्जन होणार दणक्यात! ढोलताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Pune  : ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्या ३० एवढीच मर्यादित ठेवण्याच्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. ढोल-ताशा हे पुण्याचे हृदय असून, पथकांना त्यांचे वादन करू द्या, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. त्यामुळे ‘एनजीटी’च्या आदेशामुळे ढोल-ताशांचा बसलेला ‘आव्वाज’ पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी अॅड. मैत्रेय घोरपडे यांनी ‘एनजीटी’त याचिका दाखल केली होती. ही याचिका ३० ऑगस्टला निकाली काढताना ‘एनजीटी’ने ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवर नियंत्रण आणले होते. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्या तीसपेक्षा जास्त नसावी, या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी ढोल-ताशा-झांज ही वाद्ये जप्त करावी, असे निर्देश ‘एनजीटी’ने दिले होते. त्याविरोधात पुण्यातील वंदे मातरम संघटनेच्या युवा वाद्य पथक ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अनिश पाडेकर यांनी अॅड. अमित पै व अॅड. तेजस दंडगव्हाळ यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.

Alibaug : रायगड रोह्यातील साधना कंपनी स्फोट: २ कामगारांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दुपारी दोन वाजता या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. ‘पुण्यात ढोल-ताशा वादनाचे शंभर वर्षांहून अधिक काळापासून मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव जवळ आला असताना, ढोल-ताशा पथकांची कोणतीही बाजू ऐकून न घेता ‘एनजीटी’ने हा आदेश दिला असून, ढोल-ताशा-झांज वादन करणाऱ्या पथकांवर त्याचा गंभीर परिणाम होईल,’ अशी बाजू अॅड. अमित पै यांनी मांडली. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व पुणे प्रशासनाला नोटीस काढण्याचा आदेश दिला; तसेच, ढोल-ताशा-झांज पथकातील वादकांची संख्येवर मर्यादा आणणाऱ्या ‘एनजीटी’च्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणी आता चार ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

‘वाजवायची अन् गाजवायची संधी’
‘सर्वोच्च न्यायालयाने ‘एनजीटी’च्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे ढोल-ताशा पथकांना यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजवायची अन् गाजवायची संधी मिळाली आहे. गणेशोत्सवात ढोल-ताशा वादनाची अनेक वर्षांची परंपरा असताना ‘एनजीटी’चा निकाल लागू करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयापुढे आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे,’ असे ‘ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र’चे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले.

पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच एक नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार एका पथकात ४० ढोल आणि १० ताशांना परवानगी आहे. त्याची अंमलबजावणी काही वर्षांपासून होत असून, यंदा तीच नियमावली कायम असेल.

ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘एनजीटी’ने आपल्या आदेशात नऊ निर्देश दिले आहेत. त्यापैकी केवळ ढोल-ताशा पथकातील वादकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. अन्य आठ निर्देशांचे पालन करावे लागेल.
ढोल-ताशा हा महाराष्ट्राचा खोलवर रुजलेला सांस्कृतिक वारसा असून, तो गणेशोत्सवाचा अविभाज्य घटक आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवात ‘एनजीटी’ने ढोल-ताशा पथके व गणेश मंडळांची बाजू न ऐकता, थेट वादकांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय दिला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *