आषाढी वारीसाठी आळंदीत कडक निर्बंध! ४ ते ९ जुलैदरम्यान विवाह, साखरपुडा आणि मंगलकार्यांवर बंदी

आळंदी:आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होणार असल्याने प्रशासनाने गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.४ जुलै ते ९ जुलै या कालावधीत आळंदी शहरातील धर्मशाळा,मंगल कार्यालये आणि इतर विवाहस्थळांमध्ये विवाह, साखरपुडा तसेच इतर खासगी समारंभ आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

आळंदी पोलिसांनी शहरातील सर्व धर्मशाळा व्यवस्थापक, मंगल कार्यालय चालक आणि संबंधित संस्थांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या काळात वारकऱ्यांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याने कोणत्याही अतिरिक्त कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी, सुरक्षेचा प्रश्न आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर ताण येऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आषाढी वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक आळंदीत येतात. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, निवास व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन केले असून नागरिकांनी आणि संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या सूचनांनुसार संबंधित कालावधीत विवाह किंवा साखरपुड्याचे कार्यक्रम ठेवू नयेत.कार्यक्रमांचे नियोजन इतर तारखांना करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.नियमांचे पालन न झाल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सोहळा मानला जातो. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे निर्बंध लागू केले असून नागरिकांनी संयम व सहकार्य राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *