गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर

गोवा: भारताला पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त (ड्रग्जमुक्त) करण्यासाठी केंद्र सरकारने एक ठोस आणि कालबद्ध तीन वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅप अंतर्गत ठरावीक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असून, त्याबद्दल नियमितपणे आढावा घेतला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात केली. सांताक्रूझ-पणजी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रामुख्याने उपस्थित होते.

तीन वर्षांचा विशेष रोडमॅप आणि ठोस उद्दिष्टे: बैठकीनंतर माहिती देताना गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की, देशातील अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्याला आळा घालण्यासाठी सरकारने तीन वर्षांची विशेष योजना आखली आहे. या रोडमॅपमध्ये गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे कठोर कारवाई करणे, सिंथेटिक ड्रग्जच्या तस्करीवर पूर्ण नियंत्रण मिळवणे, अमली पदार्थांची मागणी कमी करणे, प्रभावी व्यसनमुक्ती आणि हानी कमी करण्याच्या उपाययोजना राबवणे, तसेच संबंधित तपास यंत्रणांची क्षमता वाढविणे या प्रमुख मुद्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

पुढील तीन वर्षांच्या कालावधीत देशभरातील किमान १०० मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पूर्णपणे नायनाट करण्याचे आणि अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीशी संबंधित १०० फरार आरोपींना कायदेशीर मार्गाने भारतात परत आणण्याचे कठोर लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. अमली पदार्थांच्या या अवैध जाळ्याविरोधात केवळ किरकोळ कारवाई न करता, तस्करीची संपूर्ण साखळी, त्याचे आर्थिक स्रोत आणि आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त करण्यावर सरकारचा मुख्य भर राहणार असल्याचे शाह यांनी आवर्जून सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठे आव्हान आणि दहशतवादाशी संबंध: ड्रग्ज तस्करी ही केवळ एक सामान्य सामाजिक समस्या नसून ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर आव्हान आहे, असे सांगत अमित शाह म्हणाले की, अमली पदार्थांच्या अवैध तस्करीतून मिळणारा काळा पैसा अनेकदा दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा (Terror Funding) करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळेच हा लढा केवळ तस्करांना अटक करण्यापुरता मर्यादित नसून, यामागील संपूर्ण आर्थिक साखळी आणि दहशतवादी संबंध नष्ट करण्याचा आहे.

नक्षलवाद आता भूतकाळाची गोष्ट: यावेळी बोलताना शाह यांनी देशातील इतर सुरक्षा मुद्यांवरही भाष्य केले. जम्मू-काश्मीरमधून कलमी ३७० हटवल्यानंतर तिथल्या फुटीरतावादात मोठी घट झाली असून दहशतवाद शून्याच्या दिशेने जात आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच, देशातील नक्षलवादाचा मुद्दा आता 'भूतकाळाची गोष्ट' बनला असल्याचे सांगत, सुरक्षा दलांच्या धडक कारवायांमुळे नक्षलवादाचे कंबरडे मोडले असल्याचे स्पष्ट केले.

गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. राज्यात तीन नवीन न्यायसंहितांची प्रभावी अंमलबजावणी कशी सुरू आहे, यावरही चर्चा करण्यात आली. गोव्याशी संबंधित विविध प्रशासकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी गृहमंत्री शाह यांनी दिले.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *