मुंबई: भिवंडी मध्ये कोहिनूर अपार्टमेंटची ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, ९ जणांचा मृत्यूसहित युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

मुंबई: ठाण्यातील भिवंडी परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि मोठी दुर्घटना घडली आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भिवंडी महानगरपालिका हद्दीतील नारपोली परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत २००७ मध्ये बांधण्यात आली होती. या इमारतीत दोन विंग असून एकूण ३० घरे होती. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ही इमारत सुरुवातीपासूनच कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने यापूर्वीच तिला अतिधोकादायक म्हणून घोषित केले होते. गुरुवारी तळमजल्यावरील काही पिलर नादुरुस्त झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच इमारतीला तडे जाऊ लागले होते आणि रात्री आठच्या सुमारास ती एका बाजूला झुकू लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत इमारत रिकामी करण्याची कारवाई केली होती. मात्र, प्रशासनाची कारवाई झाल्यानंतरही तळमजल्यावरील दुरुस्तीचे काम सुरूच ठेवण्यात आले होते. तसेच काही रहिवासी घरातील महत्त्वाचे साहित्य किंवा कागदपत्रे घेण्यासाठी पुन्हा इमारतीत गेले होते, त्याच दरम्यान इमारत अचानक कोसळली आणि ते दुर्दैवाने ढिगाऱ्याखाली अडकले.

जेसीबीसह विविध आधुनिक यंत्रणांच्या मदतीने मलबा आणि ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत शमीम शेख (३२), रंजीत सिंग (४५), मिराज रसूल शेख (३४), संतोष कुमार पांडे (४२) आणि शमीम अन्सारी (३०) यांसह इतरांचा मृत्यू झाला असून काही मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाकडून बचावकार्य जोमाने सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *