Section 37 Imposed for 14 Days Ahead of Bakri Eid and Protests; Check Police Guidelines!

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! बकरी ईद आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी

Section 37 Imposed for 14 Days Ahead of Bakri Eid and Protests; Check Police Guidelines!
पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. आगामी सण-उत्सव, मोर्चे, विविध संघटनांची आंदोलने आणि अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शहरात पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि (३) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

आगामी काळात येणारी बकरी ईद (Bakri Eid) आणि शहरात विविध कारणांवरून होणारी संभाव्य आंदोलने व मोर्चे यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहेत पोलिसांचे निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines):

१. शस्त्रास्त्रांवर बंदी: या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला शहरात सार्वजनिक ठिकाणी लाठ्या, काठ्या, तलवारी, भाले, बंदुका, किंवा इतर कोणतीही जीवघेणी शस्त्रे घेऊन फिरण्यास सक्त मनाई असेल.

२. स्फोटक पदार्थांवर बंदी: सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्फोटक, ज्वालाग्रही पदार्थ किंवा दगड गोळा करणे, वाहून नेणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

३. पुतळे आणि फलक प्रदर्शनास मनाई: कोणत्याही व्यक्तीचे पुतळे तयार करणे, प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणे, पुतळे जाळणे किंवा प्रक्षोभक फलक व चित्रे लावण्यास बंदी असेल.

४. भाषणे आणि घोषणांवर निर्बंध: सार्वजनिक शांतता भंग होईल, नीतिमत्तेला बाधा येईल किंवा धार्मिक-सामाजिक सलोखा बिघडेल अशी प्रक्षोभक भाषणे करणे, घोषणा देणे किंवा वाद्ये वाजवण्यावर पोलिसांचे कडक नियंत्रण असेल.

५. जमावबंदीचे नियम: कलम ३७ च्या उपकलम ३ नुसार, सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मोर्चे काढण्यास बंदी असेल.

यांना नियमातून सूट:
हा आदेश शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना, पोलिसांना, विवाह सोहळे, अंत्ययात्रा तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांना ठराविक अटींनुसार लागू असणार नाही.

पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *