"Mamata Banerjee Never Lost in Bengal": Sanjay Raut Accuses Center of ‘Terrorizing’ Opposition; Fires Salvos at Nitish Kumar

बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झालाच नाही"; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर 'दहशतवादा'चा आरोप, नितीश कुमारांवरही डागली तोफ

"Mamata Banerjee Never Lost in Bengal": Sanjay Raut Accuses Center of ‘Terrorizing’ Opposition; Fires Salvos at Nitish Kumar
मुंबई  पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर प्रखर टीका केली आहे. "ममता बॅनर्जींचा पराभव झालेला नाही, तर सैन्य आणि आर्थिक दहशतवादाचा वापर करून त्यांना सत्तेपासून रोखण्यात आले आहे," असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला.

हुकूमशाहीविरोधात 'इंडिया' आघाडी ठाम
संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे. "ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न देण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारविरोधी आंदोलनाचाच एक भाग आहे. उद्धव ठाकरेंसह 'इंडिया' आघाडीचे सर्व प्रमुख नेते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. जर निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम होणार असेल, तर विरोधी पक्षांनी निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावी, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे," असे राऊत यांनी नमूद केले.

नितीश कुमारांचे 'मानसिक संतुलन' बिघडले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना राऊत यांची जीभ घसरली. "नितीश कुमार पहिल्यापासूनच भरकटलेले आहेत, ते कधीच कुठे स्थिर नव्हते. त्यांचे मानसिक संतुलन किती बिघडले आहे, हे संपूर्ण देश पाहत आहे. ते आघाडी सोडून जाणार आहेत, हे ममता बॅनर्जी यांनी पहिल्याच बैठकीत स्पष्ट केले होते," असा टोला त्यांनी लगावला. जर ममतांनी बंगालमध्ये काँग्रेसला सोबत घेतले असते, तर निकाल आज वेगळा असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

लाडकी बहीण योजनेवर ताशेरे
राज्यातील 'लाडकी बहीण' योजनेवरूनही राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. "या योजनेचे पैसे जर चुकीच्या मार्गाने कोणाच्या खिशात जात असतील, तर तो मोठा गुन्हा आहे. सरकारला या भ्रष्टाचाराची जाणीव असेल, तर त्यांनी तातडीने दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

मराठी भाषेचा सन्मान सर्वोच्च
हिंदी आणि इंग्रजी भाषेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, "आमचा हिंदीला विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावर कामासाठी ती गरजेची आहे. मात्र, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे आणि तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे." सत्तेतील काही लोकांना लोकशाहीचे पतन मान्य नाही, त्यांनी हुकूमशाहीविरोधात एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना केले.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *