नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली: देशभरात कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचं लोण प्रचंड प्रमाणात पसरलं आहे. सोनम वांगचूक यांनी २६ दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. केंद्र सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा होत आहे. दिल्लीतील जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या संख्येनं तरुणांचे मोर्चे निघत आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळी जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. याचदरम्यान, या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं भाष्य केलं आहे.

मोहन भागवत काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील आंबेडकर भवनात विश्वमांगल्य सभेत 'युगानुकूलत्व मातृत्व' कार्यक्रमात विद्यार्थी आंदोलनावर मोठं वक्तव्य केलं. मोहन भागवत म्हणाले की, "युवा पिढी आता प्रश्न विचारू लागली आहे. आपण तरुण होतो तेव्हा प्रश्न विचारत नव्हतो, आज्ञाधारक होतो. आत्ताची पिढी वेगळी आहे, प्रश्न विचारतेय. युवकांसोबत संवाद महत्त्वाचा आहे. त्यांना आदेश देता येणार नाही. नवीन पिढी विश्लेषण करत असते. त्यामुळे आपल्याला संवाद साधण्याची पद्धती बदलावी लागेल," असं भागवत यांनी यावेळी नमूद केलं.

 

पुढे ते म्हणाले की, "आधीचा काळ आज्ञांचं पालन करण्याचा काळ होता. आई-वडिलांनी जे म्हटलं, त्यावर कोणतीही चर्चा होत नव्हती. त्यांच्या आदेशानंतर शांत राहावं लागत होतं. त्यांच्यावर विश्वास होता. आपला त्यांच्या अनुभवावर विश्वास होता."

'नवीन पिढी प्रश्न विचारते'
भागवत पुढे म्हणाले, "आता काळ आधीसारखा राहिलेला नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते. आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांना वेळ देणे आणि त्यांच्याशी संवाद करण्याची गरज आहे. आता कुटुंबात संवाद होत नाही. कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्याचा मोबाईल घेऊन बसलेला असतो. घरात कोणी भेटायला आलं असेल, तरी त्याची कोणालाच माहिती नसते. हे सर्व बदलण्यासाठी भरपूर वेळ जाईल. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा बोलणे होईल. कुटुंबात संवाद झाल्यास मुले मोकळेपणाने बोलतील."

"बाळाचं पालनपोषण १२ वर्षांपर्यंत हातात असतं. आपण जे काही सांगतो, त्यावर स्वतः कृती केली पाहिजे. नवीन पिढीला तुम्ही थेट सांगितल्यास स्वीकारणार नाही. कारण ते आधी विश्लेषण करत असतात," असेही मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *