Pune : प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून २५ वर्षीय तरुणीची प्रियकराकडून हत्या; कात्रज बोगद्याजवळील धक्कादायक घटना

Pune : पुणे-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगदा परिसरात एका २५ वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

मनीषा खम्म दमाई (वय २५, रा. नऱ्हे) असे मृत तरुणीचे नाव असून, प्रकाश अर्जुन तिखात्री (वय ३०, रा. हिंजवडी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी किशन भरत परिहार (वय ३५, रा. नऱ्हे) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा आणि प्रकाश यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. मात्र, या संबंधांवरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. संबंधित तरुणीने संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर वाद अधिकच तीव्र झाले होते.

१८ मार्च रोजी आरोपी प्रकाश याने मनीषाला नऱ्हे परिसरात भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर गोड बोलून तिला कात्रज बोगद्याजवळील एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या झाडीत नेले. तेथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाच्या भरात आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

काही दिवसांनंतर झाडीत तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख पटविण्यात आली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *