मुंबई: बेस्ट बस क्रमांक ४४ च्या ढिसाळ कारभाराबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र संताप; वरळी ते काळाचौकी मार्गावरील नागरिकांचे प्रचंड हाल

 

मुंबई: महानगर क्षेत्रामध्ये प्रवाशांची लाइफलाईन मानल्या जाणाऱ्या 'बेस्ट' (BEST) उपक्रमाच्या सेवा विस्कळीत होत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः वरळी ते काळाचौकी दरम्यान धावणारी बेस्ट बस क्रमांक ४४ च्या अनियमित फेऱ्या आणि ढिसाळ कारभाराबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड रोष व संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसची तासनतास वाट पाहावी लागत असून, ऐन गर्दीच्या वेळेस बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

वरळी डेपो ते काळाचौकी आणि म्युझियम परिसरादरम्यान धावणाऱ्या या बस मार्गावर मोठ्या प्रमाणावर कामगार, नोकरदार वर्ग, शालेय विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवाशांची रेलचेल असते. मात्र, अपुऱ्या बस फेऱ्या, बसेसचे अयोग्य वेळापत्रक आणि गाड्यांची अनिश्चितता यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक वेळा बसथांब्यावर तासनतास उभे राहूनही बस येत नाही किंवा आली तरी प्रचंड गर्दीमुळे त्यात चढणे अशक्य होते. पर्यायी व्यवस्था म्हणून रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा लागत असल्यामुळे चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.

या गंभीर समस्येबाबत प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी अनेकदा बेस्ट प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बस फेऱ्यांची संख्या वाढवावी आणि वेळापत्रक शिस्तबद्ध करावे, अशी मागणी जोर धरत आहे. जर लवकरात लवकर वरळी ते काळाचौकी दरम्यानच्या बस फेऱ्या नियमित न केल्यास प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतप्त प्रवाशांनी दिला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *